मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे.
एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने हाच मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे व्हिडियो ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले किरीट सोमय्या..
शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला कि काय असं म्हणत या व्हिडियोमध्ये शिवसेनेला सवाल विचारत डिवचलं आहे.
ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला आहे का, असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.