पालिकेतील पदाधिकारी बदल ठरणार भाजपसाठी “डोकेदुखी’
किरकोळ आश्वासनांवर “बोळवण’
पुणे – भाजपने महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पदाधिकारी बदलाचे सत्र सुरू केले आहे. मात्र, हे बदल पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यतर आहे. मागील निवडणुकीत भाजपचे कमळ हाती घेतलेले अनेक नगरसेवक चार वर्षांत अपेक्षित पदे न मिळाल्याने, तसेच महत्त्वाच्या निर्णयांत आणि पक्षसंघटनेत समाविष्ट करून घेतले जात नसल्याने नाराज आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी भाजपला रामराम ठोकत “घरवापसी’चे संकेत ही मंडळी देत आहेत. त्यामुळे अनेकांनी आपल्या बोर्ड, बॅनर्सवरून पक्षाचे नेते आणि चिन्ह काढण्यास सुरूवात केली आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीवेळी भाजपने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसेला खिंडार पाडत त्यांचे त्यावेळचे विद्यमान नगरसेवक गळाले लावले. त्यामुळे निवडणुकीनंतर महापालिकेत भाजपचे संख्याबळ 26 वरून थेट 100 वर पोहचले. मात्र, हे “आयाराम’ भाजपकडून कोणते ना कोणते आश्वासन घेऊन पक्षात आले होते. मात्र, “भाजपने चार वर्षांत आमच्या तोंडाला केवळ पानेच पुसली असून, केवळ ठराविक व्यक्तींनाच पक्षात महत्त्वाची पदे दिली जात आहेत,’ असा आरोप हे नगरसेवक सातत्याने करत आले आहेत.
भाजपमध्ये येताना दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याचा त्यांचा थेट आरोप आहे. याबाबत काही नगरसेवकांनी संबंधितांकडे खासगीत नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र, त्यांना गेली तीन वर्षे त्यांना “पुढच्या वेळी संधी देऊ’ असे सांगत टोलवले जात आहे.
अंदाजपत्रकातही दुजाभाव केल्याचा काही नगरसेवकांचा आरोप आहे. “प्रभागातील कामे मार्गी लागत नाहीत’, “पदाधिकारी वेळ देत नाहीत’, “विकासकामेच झाली नाहीत, तर आम्ही निवडणुकीला कसे तोंड द्यायचे’ असा सवाल हे नगरसेवक करत आहे. मात्र, या तक्रारींची दखल घेण्याऐवजी “आता आपल्या हातात काही नाही. पक्ष घेईल तो निर्णय मानावाच लागेल,’ असे सांगत या नगरसेवकांची बोळवण केली जात आहे.
आयारामांची कोंडी
2022 च्या सुरुवातीलाच महापालिका निवडणुका होतील. त्यापूर्वी तरी आपल्याला महापालिकेतील मानाची पदे मिळावीत, अशी या नगरसेवकांची अपेक्षा होती. मात्र, यापूर्वी मोठी पदे मिळालेल्या नगरसेवकांनाच पक्ष संधी देत आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीवेळी भाजपत आलेल्या नगरसेवकांची आणखी कोंडी झाली आहे. “किमान शेवटच्या वर्षीतरी भाजप आम्हाला संधी देईल’ ही आशा असली, तरी काही नगरसेवक भाजपला “रामराम’ ठोकण्याच्या तयारीत आहेत.
ठराविकच जणांना संधी का?
भाजपकडून ठराविक लोकांनाच संधी दिली जात असल्याचा प्रमुख आक्षेप काही नगरसेवकांचा आहे. “आम्हाला काहीतरी आश्वासन देऊन पक्षात घेऊन आलेले पक्षाचे नेते आता शहरात लक्ष देत नाहीत,’ “पक्षाचे प्रदेशाध्यक्षच आता थेट पुण्यात लक्ष घालतात, त्यांनाही काही ठराविक नगरसेवकच जवळचे वाटतात. आम्हांला केवळ शहरभर कार्यक्रम घेण्याचे निरोप देतात; मात्र नियोजनात घेतही नाहीत. गेल्या चार वर्षांत केवळ ठराविक लोकांनाच संधी देऊन केवळ ते म्हणेच भाजप असे का?’ असा सवालही हे नगरसेवक उपस्थित करत आहे.