नवी दिल्ली : भारतावर दहशतवादी हल्ला करण्यात येणार असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशियामध्ये भारतातील शहरांवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला आहे. याचा खुलासा इस्लामी धर्मगुरु झाकीर नाईक आणि रोहिंग्या दहशतवादी संघटनांमध्ये झालेल्या दोन लाख डॉलर्सच्या व्यवहारानंतर करण्यात आला असल्याचे सुत्रांनी दिलेल्या माहितीनंतर करण्यात आला आहे.
भारतावरील दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आल्यानंतर माहिती मिळाली आहे की, म्यानमारमधील महिलांना दहशतवादी हल्ल्यासंदर्भात ट्रेनिंग देण्यात आली आहे. येणाऱ्या पुढच्या काही आठवड्यांमध्ये अयोध्या, बोधगया, पंजाब आणि श्रीनगर या शहरांमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट आहे. रॉ (रिसर्च अॅनालिसिस विंग) कडून दिल्ली पोलिसांना ही माहिती देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त देशातील इतर महत्त्वाच्या शहरांतील पोलिसांनाही यासंदर्भात अधिक तपशील पाठवण्यात आले आहेत.
सुत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हाती आलेल्या माहितीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, झाकिर नाईक काही रोहिंग्या नेत्यांसोबत मिळून भारतातील काही शहरांवर हल्ला करण्याचा कट रचत आहे. यासाठी झाकिर नाईकच्या खात्यातून दोन लाख डॉलर्स ट्रान्सफर करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त दक्षिण भारतातील एक व्यापारी या कटामध्ये सहभागी असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. तसेत हेदेखील सांगितलं जात आहे की, एका महिला दहशतवाद्याचाही या कटामध्ये समावेश आहे.
26 जानेवारीपूर्वी हा हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असणार असल्याचीही माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, पीएफआयही या कटामध्ये सहभागी असून रोहिंग्यांना मदत करणार असल्याची माहितीही सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली आहे.