चरेगाव – उंब्रज, ता. कराड येथील लक्ष्मीनगर येथील स्थानिक रहिवाशी रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. त्यामुळे या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले असून गेल्या काही दिवसांपासून हा कचरा पडून तो रस्त्यावर आला आहे. येथे रस्त्याकडेला कचरा कुंडीची व्यवस्था येथील कै. रामचंद्र दिनकरराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टकडून करण्यात आली होती. परंतु, सध्य स्थितीत या कचरा कुंडीची दुरवस्था झाल्यामुळे येथील नागरिक रस्त्याकडेला कचरा टाकत आहेत.
तसेच त्याच ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह असल्याने सांडपाणीही रस्त्यावर येत आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालला आहे. दरम्यान, येथील घाणीमुळे स्थानिकांना नाकीनऊ आले आहे.
कितीही घाण उचलली तरी पुन्हा-पुन्हा येथे घाणीचा खच पडत आहे. त्यामुळे संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. लक्ष्मीनगरलगत प्राथमिक आरोग्य केंद्र, महात्मा गांधी विद्यालय, महिला महाविद्यालय आहे. परंतु, या परिसरात घाण टाकत असल्यामुळे याचा त्रास विद्यार्थ्यांसह रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांना होत आहे. या रस्त्यावरून जाताना विद्यार्थी तसेच नागरिकांना नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडून वारंवार येथे टाकलेला घाणीचा खच उचलला जातो.परंतु, पुन्हा ‘ ये रे माझ्या मागल्या ‘ प्रमाणे दोन दिवसांत कचऱ्याचा खच निर्माण होत आहे.
येथे सार्वजनिक शौचालये आहेत. परंतु, महिला, वृध्द तसेच लहान मुले हे उघड्यावरच शौचास बसत असल्याने दुर्गंधीचत आणखीनच वाढ होत आहे. ग्रामपंचायत प्रशासन तसेच आरोग्य विभागाने याबाबत लक्ष घालून हा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्यविषयक योजनांना येथे हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या परिसराचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून येथील आरोग्य समस्या दिवसेंदिवस जटील होत आहेत. स्थानिकांना आरोग्यविषयक समस्यांतून बाहेर काढावयाचे झाल्यास शासनाचे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवणे आवश्यक तसेच सखोल मार्गदर्शनासह सार्वजनिक आरोग्यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे.