सातारा -उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी करणाऱ्या दोन टोळ्या तडीपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिला असून त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात दहशत पसरवणाऱ्या टोळ्या नव्या पोलीस अधीक्षकांच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उंब्रज व पाटण या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या, दरोडा, मारामारी करणाऱ्या टोळीचा प्रमुख संदीप भानुदास भिंताडे (वय 25, रा. जाळगेवाडी, ता. पाटण), सागर उर्फ बंडा शंकर गायकवाड (वय 27), सोन्या उर्फ शाहिद शब्बीर मुल्ला, रोशन उर्फ रोशा अरविंद सोनावले (वय 21, रा. उंब्रज, ता. कराड) यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांचे कारमाने सुरुच होते. या टोळीला 2019 मध्ये सहा महिने सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते; परंतु हा कालावधी संपताच त्यांनी पुन्हा दोन गंभीर गुन्हे करुन समाजात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे या टोळीतील चौघांना सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा या तालुक्यांमधून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, खंडणी, विनयभंग, मारामाऱ्या, दमदाटी करणाऱ्या टोळीचा प्रमुख रणजित नथुराम सरगर (वय 23, रा. वाघेश्वर, ता. कराड) अक्षय उर्फ आप्पा अंकुश लोखंडे (वय 24, रा. संजयनगर, मसूर, ता. कराड), धीरज रघुनाथ जाधव (वय 30, रा. वाघेश्वर, मसूर) यांना सुधारण्याची संधी देऊन आणि प्रतिबंधात्मक कारवाया करुनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. या दोन टोळ्यांमधील सर्वांना हद्दपार करण्याची मागणी जनतेतून होत होती. त्यानुसार उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलीस अधीक्षक बन्सल यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर चौकशी व सुनावणी घेऊन बन्सल यांनी सात जणांना तडीपार केले आहे. या सुनावणीत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि आनंदसिंग साबळे व सहाय्यक फौजदार मधुकर गुरव यांनी पुरावे सादर केले.