पश्चिम भागातील स्थिती : अधिकारी, ठेकेदारांकडून निष्काळजीपणाचा कळस
राजगुरूनगर- खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील ओढ्यावरील तीन बंधाऱ्यांचे 71 ढापे चोरीला गेल्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांच्या निष्काळीजीमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खेड तालुक्यात ठेकेदारामार्फत गेल्या वर्षीपर्यंत बंधारे ढापे बसविणे आणि काढण्याची जबाबदारी आदिशक्ती संस्थेवर होती.
मात्र, संबंधित ठेकेदाराने गतवर्षी चोरीला ढापे गेलेले बंधारे अडवले होते. त्यामुळे ढापे काढुन ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याची जबाबदारी ठेकेदाराची होती. तशी कागदोपत्री पोहोच या कार्यालयाकडे देणे आवश्यक असताना चोरीला गेलेले 71 ढाप्यांचा ठपका ठेकेदारावर ठेवण्यात आला आहे. याबाबत खेड पंचायत समितीचे जलसंधारण विभागाचे (छोटे पाटबंधारे विभाग) शाखा अभियंता डी. बी. उभे यांनी सांगितले की, 80 बंधाऱ्यांचे ढापे बसविणे आणि काढण्याची कामे संबंधित ग्रामपंचायतींना देऊन तसा निधी वर्ग करण्यात आला होता.
त्यामुळे वेळेत बंधारे अडविले गेल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होणार आहे. आतापर्यंत 76 पैकी 69 बंधारे अडविण्यात आले आहे. तीन बंधाऱ्यांचे ढापे चोरीला गेल्यासंदर्भात ग्रामपंचायतींकडून समजल्यानंतर संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी सूचना आणि नोटीस पाठवुन देऊन या गहाळ झालेल्या ढाप्यांबाबतची प्रचलित किमंतीनुसार वसुल करण्याबाबत वरीष्ठ कार्यालयाला कळवले. व 4 लाखांचे देयक अदा करू, नये याबाबतचा पत्र जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाला देण्यात आले आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमाशंकर अभयारण्य परिसरातील टोकावडे येथील 25 लाखांचा नवीन बंधारा बांधण्यात आला, 28 पैकी 26 नवीन ढापे चोरीला गेले. अंबोली परीसरातील विऱ्हाम येथील बंधाऱ्याचे 36 पैकी 19 ढापे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 3 बंधाऱ्यांचे एकूण 71 नवीन ढापे चोरीला गेल्याचे उघडकीस आले असताना हे ढापे लोखंडी असल्यामुळे एका ढाप्याची किमंत 6 ते 7 हजार असते, शक्यतो असा लोखंडी माल भंगारात जाणे शक्य नसते; मात्र नवीन बंधारा झाल्यानंतर काही महाभाग ठेकेदार विकतेचे ढापे घेण्याऐवजी जुन्या ढाप्यांना रंगोटी करुन गोलमाल करीत असल्याची चर्चा सुरू आहे.
अधिकारी “मूग गिळून गप्प’
पाईट परिसरातील पाळु येथील बंधाऱ्यांचे 32 पैकी 26 ढापे दुसऱ्यांदा चोरीस गेले आहे. पाळु येथील बंधाऱ्यांचे पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या ताब्यातुन चोरीला गेले होते.अखेर तत्कालीन सभापती सुरेश शिंदे यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करुन या बंधाऱ्याला ढाप्यांसाठी निधीची तरतुद करुन नवीन ढापे बनविण्यात आले असताना पुन्हा बंधाऱ्याचे ढापे चोरीला जाऊन प्रशासकीय यंत्रणेवर पदाधिकाऱ्यांचा अंकुश नसल्याने अधिकारी “मगू गिळुन गप्प’ आहे.
“ते’ हात वर करून मोकळे
चोर कोण हे शोधण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असताना ग्रामपंचायतीबरोबरच पाण्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची जबाबदारी असल्याचा कागांवा करून हात करून मोकळे होतात. मात्र, ढापे चोरीची तक्रार पोलीस ठाण्याला साधा अर्ज करून कळविण्याची जबाबदारी घेण्यात अधिकारी का पुढे येत नाही, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहे.