पुणे – जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल 100 कोटीची फसवणूक करण्यात आली. हे पैसे हवालामार्फत परदेशात पाठविण्यात आले आहेत. याप्रकणी सक्त वसुली संचनालयाने एका कुटूंबातील तीन व्यक्तींसह पाच जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी ईडीचे सहायक संचालक रत्नेशकुमार भुवनेश्वरलाल कर्ण (43) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे (सर्व रा. निर्माण विवा सोसायटी, सिंहगड महाविद्यालयाजवळ, आंबेगाव), किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडधे आणि अन्य साथिदारांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपींनी व्हिआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल ऍफिलेट बिझनेस नावाने सर्व सामान्य नागरिकांना प्रतीमहा दोन ते तीन टेक्क व्याज दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून खोटी स्कीम राबवली. त्यांनी नागरिकांकडून थेट त्यांच्या खात्यात पैसे न घेता वेगवेगळ्या बोगस बॅंक खात्यांमध्ये पैसे घेतले.
पैसे गुंतवणाऱ्यांना कमिशनचे आमिष दाखवून अन्य लोकांनाही स्किममध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले. यामुळे पैसे गुंतवणाऱ्यांचे नातेवाईक आणि मित्र मंडळी मोठ्या प्रमाणात फसले गेले आहेत. यातील मुख्य आरोपी विनोद खुटे याने फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली काना कॅपीटल नावाची कंपनी बनवली होती.