पुणे – लोकसभेची ही निवडणूक देशासाठी प्रतिष्ठेची आहे. शेतकर्यांचं धोरण, परराष्ट्र धोरण ठरवणारी ही निवडणूक आहे. गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान मोदींनी केलेलं कामे विचारात घेऊनच मतदान करायचं आहे, असे प्रतिपादन महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील रेसकोर्स येथील सभेत बोलताना केले. आढळराव पुढे म्हणाले की, केंद्र सरकार शेतकर्यांच्या विरोधातलं असल्याची कांगावा केला जातो. पण गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने 12 कोटी शेतकर्यांना 6 हजार रुपये प्रत्येकी असे 72 हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षाला आणि पाच वर्षात 3 लाख 60 हजार कोटी शेतकर्यांच्या खात्यावर जमा केले.
खर्या अर्थाने शेतकर्यांसाठी मोलाचा हातभार केंद्र सरकारने लावला. केंद्राने 1 लाख टन कांदा निर्यातीला जी परवानगी दिली. ती शेतकर्यांच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. तर दुधाला पाच रुपये लिटर अनुदान हे राज्य सरकारने दिलं. प्रधानमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून ही योजना राज्यात लागू केली. त्याचा फायदा शेतकर्यांना झाला.
वाहतूककोंडी सोडविण्याला प्राधान्य
आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आवाहन केले की, शिरुर लोकसभेतील महत्वाचे प्रश्न म्हणजे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प मार्गी लावणे. तसेच तळेगाव- चाकण- शिक्रापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यासाठी लक्ष द्यावे.