नगर -शहरातील बहुतेक भागात वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे नागरीकांना बऱ्याचदा अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत पुढील आठ दिवसांत यंत्रणा दुरुस्त करावी. अन्यथा भाजपतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज महापौर बाबासाहेब वाकळे व पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिला.
वीज पुरवठ्याच्या मुद्यावर महापौर वाकळे, पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष गंधे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, संजय ढोणे, गणेश नन्नवरे, सतीश शिंदे, पुष्कर कुलकर्णी, ज्ञानेश्वर काळे, नानासाहेब जेवरे आदींनी आयुक्तांची भेट घेतली. तसेच त्यांच्याकडे या संदर्भात भूमिका मांडली.
शहरातील मध्यवस्तीत व उपनगरांत गेल्या 15 दिवसांपासून विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे.
वीज नसल्याने रात्रीच्या वेळी उपनगरांत पूर्णत: अंधार असतो. त्याबाबत वेळोवेळी सांगितले. मात्र, विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. सध्याही शहरात मोठया प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामध्ये विद्युत पुरवठा पुन्हा-पुन्हा खंडीत होत आहे. हा विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या दृष्टिने कार्यवाही व्हावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असेही महापौर बाबासाहेब वाकळे व भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष गंधे यांनी दिला.