-हिमांशू
नाटकवाल्यांना ठाऊक आहे, टाइम आणि स्पेस ही अवघड गणितं दिग्दर्शकाला रंगमंचावर सांभाळावी लागतात. म्हणजेच, अवघ्या काही सेकंदांच्या “ब्लॅकआउट’नंतर दुसरा दिवस सुरू होऊ शकतो. दुसरं वर्ष सुरू झालेलं असू शकतं किंवा कदाचित चार-पाच वर्षांचा काळसुद्धा लोटलेला असू शकतो. हे झालं काळाचं म्हणजे टाइमचं गणित.
स्पेसचं म्हणचे स्थळाचंही गणित असंच असतं. रंगमंचाच्या चौकटीत कधी राजवाडा उभा करावा लागतो, कधी रुग्णालय, कधी मैदान तर कधी बगीचा उभा करावा लागतो. एखाद्या “ब्लॅकआउट’नंतर रंगमंचावरचं ठिकाणही बदललेलं असतं. पण खरंतर हीच रंगमंचाच्या चौकटीची अस्सल ताकद मानली जाते. इथं कोणताही काळ आणि कोणतंही स्थळ अत्यंत कमी साधनांच्या मदतीनं उभं करता येतं.
“टाइम अँड स्पेस’चं हे गणित राजकीय रंगमंचावरही सतत पाहायला मिळतं. कधीतरी सकाळी झोपेतून उठल्याबरोबर टीव्हीवर अचानक शपथविधी दिसतो आणि अवघ्या काही तासांत राजकीय रंगमंचावरचं नेपथ्य बदललेलं असतं. “राज्यातलं सरकार फार काळ टिकणार नाही. त्यांच्यात अंतर्विरोध आहे आणि त्यामुळंच ते पडेल,’ हा संवाद आता पात्रांनाच नव्हे तर प्रेक्षकांनाही तोंडपाठ झालाय. कधी तीनपैकी एक पक्ष नाराज असल्याचं सांगितलं जातं, तर कधी एखाद्या पक्षातला वजनदार नेता नाराज असल्याची चर्चा सुरू होते. आरोप-प्रत्यारोप आणि सवाल-जवाब सुरू होतात आणि उरलेला वेळ राज्यकारभाराला दिला जातो.
राजकीय रंगमंचावर दिसलेलं “टाइम’चं एक गणित स्वातंत्र्यदिनी खूप फेमस केलं गेलं. अवघ्या काही सेकंदांचा सीन; पण सर्वांच्याच भुवया “म्हणे’ उंचावल्या! पुण्याच्या विधान भवनाच्या प्रांगणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ध्वजारोहण केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री या नात्यानं अजितदादा पवार तिथं उपस्थित होते. राज्यपाल आणि दादा यांची भल्या सकाळची भेट अनेकांना, विशेषतः पत्रकारांना आठवली. मग ध्वजारोहणाच्या समारंभात झालेले संवाद सुपरहिट झाले. नाटकात जसे काही संवाद “सजेस्टिव्ह’ असतात, तसे ते असल्याचं तातडीनं प्रसिद्ध झालं. “तुमची परवानगी न घेता तुमच्या राज्यात आलो आहे,’ असं राज्यपाल दादांना म्हणाले आणि “ऐसा कुछ नही,’ म्हणत दादांनी त्यांना मिश्किलपणे उत्तर दिलं.
हे संवाद खरोखर इतके बुचकळ्यात टाकणारे होते की अनेकांनी “लेखका’चा शोध घ्यायला सुरुवात केली, अशी “आतली’ बातमी आहे. गेल्या काही दिवसांत उद्भवलेला (किंवा न उद्भवलेला) वाद या घटनेत प्रतिबिंबित झाल्याचे धागेदोरे काही “समीक्षकां’ना सापडले. प्रायोगिक नाटकाचीसुद्धा इतकी आशयघन समीक्षा कधी झाली नसेल. वेळ, काळ आणि स्थळाचे विविधांगी दाखले देत “समीक्षकां’नी चर्चा पुन्हा एकदा सरकारच्या टिकाऊपणाकडे वळवण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न स्पृहणीयच!
काही सेकंदांच्या या “रंगमंचीय’ घटनेचं वार्तांकन वाचताना आम्हाला काही वर्षांपूर्वी पाहिलेल्या एका सुंदर एकांकिकेची आठवण झाली. एक टिपिकल मध्यमवर्गीय माणूस बसखाली सापडतो. त्याला वाचवायला दुसरा मध्यमवर्गीय उडी घेतो. बसची मागची चाकं आता या दोघांच्या दिशेनं येत आहेत. त्या एका सेकंदात एक मध्यमवर्गीय मेंदू काय-काय विचार करेल, हे एकांकिकेत दाखवलं होतं. काही सेकंदांच्या सूचक डायलॉगमधून राजकीय मेंदूंनी केलेला संभाव्य विचार “समीक्षकां’च्या मेंदूतून ऐकताना अगदी तसंच वाटलं!