जागतिक मंदीचा भारतावर अल्पसा परिणाम झाल्याचा दावा
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील सहा महिन्यांत देशाचा विकास आणि सुरक्षा या बाबींवर भर देण्यात आला. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यासाठी कलम 370 हटवण्यात आले. त्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद नीचांकी पातळीवर पोहचला आहे, असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी केला.
मोदी-2 सरकारने सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. सरकारने उचललेल्या पाऊलांमुळे देश वेगाने प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. जागतिक मंदीचा आपल्या देशावर अल्पसा परिणाम झाला. त्या परिणामांतून बाहेर पडण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही जावडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती देताना त्यांनी कलम 370 हटवण्याचा उल्लेख केला. त्या निर्णयामुळे काश्मीरमधील शांततेचा मार्ग मोकळा झाला. त्याआधी काश्मीरमध्ये दहशतवादाने डोके वर काढले होते. मात्र, आता दहशतवाद मागे पडला आहे. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी नवे मार्ग खुले झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांमुळे भारताची जगातील प्रतिमा मजबूत झाली आहे, असेही त्यांनी म्हटले.