दर शनिवारी पुण्यात होणाऱ्या मानसशास्त्र विषयावर काम करणाऱ्या एका गटाच्या बैठकींना मी जात असतो. या गटाच्या बैठकींचा गेल्या महिन्याचा विषय होता संघशक्ती. गटाच्या एका प्रमुख बाईंनी हसत सांगितलं, “मला एका व्यक्तीनं विचारलं की संघ म्हणजे रा. स्व. संघ का? मग मी त्यांना उत्तर दिलं संघशक्ती याचा अर्थ “टीमवर्म’ किंवा एकजुटीनं केलेलं काम असा आहे. त्याचा कोणत्याही संघटनेशी संबंध नाही.’
मी कुठंतरी वाचलं आणि माझ्या एकदम ते मनातच भरलं. तिथं म्हटलं होतं की दोन माणसं जेव्हा एकदिलानं काम सुरू करतात तेव्हा त्या दोघांची बेरीज न होता गुणाकार होतो. त्या दोघांनी एकत्र काम करणं हे जणू अकरा माणसांनी केल्याप्रमाणे होतं. म्हणूनच “गाव करील ते राव काय करील?’ अशी म्हण मराठीत आहे. लहानपणी पंचतंत्र किंवा हितोपदेशात वाचलेली गोष्ट अजून आठवते. एकदा एका शिकाऱ्यानं पसरलेल्या जाळ्यात दाणे टिपताना अनेक पक्ष्यांचे पाय अडकून जातात. थोडावेळ ते घाबरतात, गोंधळतात पण लवकरच एका ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याच्या सांगण्यावरून ते सगळे पक्षी एकावेळी पंख फडफडवतात आणि ताकद एकवटून त्या भल्याथोरल्या जाळ्यासह उडून जातात.
मुंग्या आणि मधमाश्या यांचं उदाहरण तर जवळजवळ प्रत्येकालाच माहीत आहे. एवढीशी दिसणारी मुंगी कडकडून चावते. एकावेळी तर मुंग्यांच्या वारुळावर हल्ला करणाऱ्या एका सापाला शेकडो मुंग्यांनी ठार मारल्याचे उदाहरण आहे.
थेंबथेंब गोळा करून मधमाश्या किती किलो मध जमवतात हेही आपल्या पाहण्यात आहे. गणेशोत्सवात गेली काही वर्षे दिसणारी युवक युवतींची शिस्तबद्ध ढोलपथके, शंभराहून जास्त वर्षे मुंबईत चाललेली डबेवाल्यांची व्यवस्था, पडद्यावर फक्त नायक-नायिका अन् खलनायक एवढेच भाव खात असले तरी तीन तासांचा एक चित्रपट होताना अक्षरशः हजारो माणसं राबत असतात.
तसंच उदाहरण रोजच्या वृत्तपत्राचंही आहे. कुठेतरी समारंभ, कुठे गुन्हे, मंडई, खेळ, राजकारण, शिक्षा, बॅंका अक्षरशः शेकडो घडामोडींच्या हजारो बातम्या वृत्तपत्रात चहुदिशांनी येतात, अनेकजणांच्या हाताडोळ्यांखालून त्या जातात आणि दुसऱ्या दिवशी एखाद्या मुलाकडून छापील कागदावर त्या आपल्यापर्यंत पोचतात. एवढ्याशा किमतीत चौपट किमतीचा मजकूर आपल्यापर्यंत आणणारं वृत्तपत्र शेकडो जणांनी एकत्र काम केल्यामुळंच आपल्यापर्यंत येऊ शकतं.
दोन किंवा त्याहून जास्त माणसं एकाच ध्येयासाठी, निर्मितीसाठी सातत्यानं प्रयत्न करतात, त्यातून येणारे परिणाम म्हणजे हरणं किंवा जिंकणं हे स्वीकारतात आणि पुन्हा नव्या दमानं कामाला तयार होतात. त्या गटाला संघ (टीम) म्हणता येईल.
मग तो गट किंवा संघ दोघांचा असेल, क्रिकेटसारखा अकराजणांचा असेल किंवा कदाचित शेकडो, हजारो किंवा काही बाबतीत लाखोजणांचा असू शकेल. स्वाध्याय परिवार ही आध्यात्मिक संघटना शब्दशः लाखो लोकांची आहे. तळागाळातील कोळी बांधव आणि तत्सम इतर जणांसाठी ती प्रत्यक्ष काम करते. त्या संघटनेचे प्रणेते आठवले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्या संघशक्तीत शिस्त असते, एकमेकांत संवाद असतो, एकमेकांवर विश्वास असतो, दोन सदस्यात मतभेद झाले तर ते सामोपचाराने मिटवले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गटात राहूनही त्या व्यक्तीची स्वतःची वेगळी ओळख शिल्लक असते. त्याला ती टिकवता येते आणि अभिमानानं मिरवताही येते. दहीहंडीच्या वेळी मुंबई-पुण्यात सहा-सात थर लावून लाखो रुपयांची बक्षिसं जिंकतात. त्यावेळी सगळ्यात खाली दणकट अंगाचे दहाबाराजण, त्यांच्या खांद्यावर पाच-सहाजण, त्यावर चार, त्यावर दोन, मग सडपातळ एकजण आणि सर्वात वर हंडी फोडणारा तर अत्यंत छोटा अन् हडकुळा मुलगा असतो. एकमेकांचा भार एकमेकांवर पेलू शकतील अशीच रचना त्यावर केली जाते.
भार न घेऊ न शकणारे हडकुळे खाली अन् हंडी फोडणारा दणकट अशी रचना तर होऊच शकणार नाही. ती टिकणारही नाही. पण गटामधला प्रत्येकजण त्यावेळी महत्त्वाचा असतो आणि खाली आरडाओरड सुरू तर वरून पाणी असा मारा अंगावर घेत दहीहंडी फोडली जाते. आयुष्यात कोणाचीच मदत घेणार नाही उसं म्हणणारा माणूस फक्त जंगलात राहून पानं फळं खाऊ शकेल. समाजात कोणीच एकटा राहू व जगू शकणार नाही. संघशक्तीनंच पर्यावरण, सार्वजनिक शिक्षण व आरोग्य स्वच्छता, पाणी असे अनेक प्रश्न खरं तर सहज चुटकीसारखे सुटू शकतील. फक्त सुजाण, सज्ञान, साक्षर नागरिकांनी एकत्र जमण्याची, राहण्याची व काम करण्याची गरज आहे.
सहजानंद