अशोक सुतार
गोवा राज्यातील पणजीपासून जवळच साडेआठ हजार वस्तीचे बर्डेज गाव असून तिथे सुप्रसिद्ध रीस मॅगोस किल्ला आणि बर्डेजमधील पहिली रीस मॅगोस चर्च ही दोन प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत. पणजी शहरालगत मांडवी नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर बर्डेज हे गाव वसले आहे. रीस मॅगोस हा शब्द पोर्तुगीज भाषेतील असून बायबलमध्ये उल्लेख केलेल्या तीन शहाण्या पुरुषांसाठी ठेवलेले हे नाव आहे. रीस मॅगोस किल्ल्याची प्रथम उभारणी 1493 साली विजापूरच्या आदिलशहाने केली होती. त्याने या किल्ल्यावर सशस्त्र चौकी बसवली होती.
पोर्तुगीजांनी 1541 साली बर्डेज जिंकले आणि त्यानंतर रीस मॅगोस किल्ला ताब्यात घेऊन त्याच्या पायथ्याशी त्याच नावाचे चर्च बांधले. या किल्ल्यावर जगप्रसिद्ध मरिओ मिरांडा यांनी रेखाटलेली रेखाचित्रे ही तत्कालीन पोर्तुगीज संस्कृतीची व स्थानिक संस्कृतीची ओळख करून देतात.
या किल्ल्यामध्ये 1551 सालात बदल करण्यात आले. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला हिंदू मराठ्यांविरुद्धच्या युद्धात पोर्तुगीज जिंकले. किल्ल्याचे बांधकाम पोर्तुगीज पद्धतीचे असून भिंतीना तांबड्या रंगांचे दगड वापरण्यात आले आहेत. हा किल्ला भुईकोट प्रकारामधील असून जमिनीपासून सुमारे अडीचशे ते तीनशे फूट उंच आहे. या किल्ल्याचा वापर कैद्यांना तुरुंगात ठेवण्यासाठी करण्यात येत होता. या किल्ल्याला अनेक पोर्तुगीज पद्धतीचे बुरुज बांधले आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी किल्ल्याच्या बांधकामात बदल करण्यात आले.
1707 सालामध्ये हा किल्ला सुस्थितीत उभारण्यात आला होता. रीस मॅगोस चर्चसमोरून गेलेल्या पायऱ्या चढून वर गेले की काही अंतरावर किल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. या किल्ल्यावर 33 तोफा आणि जागोजागी शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी छोट्या चौक्या उभारण्यात आल्या आहेत. या किल्ल्यावरून समुद्राचे निळेशार पाणी, नारळ- माडाची झाडे पाहता येतात.
ब्रिटिश सैन्याने 1798-1813 च्या दरम्यान या किल्ल्यावर कब्जा केला होता. या किल्ल्यावर तीन-चार इमारती आहेत. यातील एक इमारत 1550 सालामध्ये फ्रान्सिस्कन्सनी पॅगोडाच्या अवशेषांवर बांधली होती. या इमारतीच्या फरसबंदीवर शिलालेख लिहिले आहेत. डोम लुस दे अताडे, काउंटी ऑफ अफेडिया यांचे अवशेष येथे आहेत. भारत आणि गोवा येथील पोर्तुगीज साम्राज्याचे ते दोन वेळा व्हाइसराय म्हणून होते. या किल्ल्यावर सदर व्हाइसरायचे निवासस्थान होते, नंतर ते एका किल्ल्यात रूपांतर झाले. 1993 पर्यंत हा किल्ला तुरुंग म्हणून वापरला गेला. आता पर्यटकांचे आकर्षण म्हणून किल्ल्याचे सांस्कृतिक केंद्रात रूपांतर झाले आहे.