हरारे – सिकंदर रझाने फटकावलेल्या अफलातून शतकानंतरही यजमान झिम्बाब्वेला भारताविरुद्धच्या तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय लढतीत 13 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या डावात दमदार शतकी खेळी केलेल्या शुभमन गिलनेच सुर मारत झेल घेत रझाची स्वप्नवत खेळी संपूष्टात आणली व भारताचा 3-0 असा निर्विवाद मालिका विजय साकार केला.
भारताने विजयासाठी दिलेल्या 290 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रझाचे शतक व ब्रॅड इव्हान्सच्या उपयुक्त फलंदाजीनंतरही त्यांचा डाव 50 व्या षटकांत सर्वबाद 276 धावांवर रोखला गेला व भारताने 2010 सालापासूनचा झिम्बाब्वेविरुद्धचा सलग 15 वा विजय साकार केला. झिम्बाब्वेच्या डावाची सुरुवात खराब झाल्यावरही सिन विल्यम्सने 45 धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तो बाद झाल्यावर मात्र, संपूर्ण डावाची सुत्रे रझाने आल्या हाती घेत एक अविश्वसनिय शतकी खेळी केली.
कर्णधार रेगिस चिकाब्वासह प्रमुख फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना रझाने इव्हान्सला हाताशी घेत डाव सावरला व संघाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढताना विजयाची आशा निर्माण केली. इव्हान्सला आवेश खानने 28 धावांवर बाद केले. या जोडीने 8 व्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत भारताचा पराभव होणार अशीच परिस्थिती निर्माण केली होती, त्याला आवेश खानसह अन्य गोलंदाजांनी दीशाहिन गोलंदाजी करत हातभारही लावला होता. मात्र, त्याच आवेश खानने व्हिक्टर नाउचीला बाद करत संघाचा विजय साकार केला.
रझाने शतक पूर्ण करताना सामना रोमहर्षक स्थितीत आणला होता. मात्र, त्यानंतर अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात तो गिलकडेच झेल देत बाद झाला. त्याने आपल्या 115 धावांच्या खेळीत 95 चौंडूंचा सामना करताना 9 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी केली. त्याची ही खेळी शार्दुल ठाकूरने संपूष्टात आणली व भारताच्या विजयातील मोठा अडसर दूर केला. भारताने ही तिन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 अशी निर्विवाद जिंकताना यजमान झिम्बाब्वेला व्हाइटवॉश दिला.
तत्पूर्वी, शुभमन गिलचे दमदार शतक व इशान किशनची अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 बाद 289 धावा उभारल्या. भारताच्या डावाची सुरुवात कर्णधार लोकेश राहुलने शिखर धवनच्या साथित करताना अर्धशतकी सलामी दिली. राहुल 30 तर धवन 40 धावा काढून परतले. त्यानंतर गिलने इशानला साथिला घेत संघाचा डाव सावरताना आक्रमक शतकी सलामी दिली. या जोडीने आपापली अर्धशतके पूर्ण केली. इशान मात्र, त्यानंतर लगेचच बाद झाला. त्याने आपल्या 50 धावांच्या खेळीत 61 चेंडूंत 6 चौकार फटकावले.
गिलने आपले एकदिवसीय सामन्यांच्या कारकीर्दीतील पहिलेच शतक साकार केले. या जोडीने संघाचे द्विशतक फलकावर लावले. इशान बाद झाल्यावर मात्र, संजू सॅमसनच्या 15 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता बारताच्या अन्य फलंदाजांनी साफ निराशा केली. गिलने 97 चेंडूंचा सामना करताना 15 चौकार व 1 षटकार फटकावताना 130 धावांची खेळी केली. शार्दुल ठाकूरने 9 धावा केल्या. तळातील फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे भारताला त्रिशतकी धावसंख्या उभारता आली नाही. भारताने 50 षटकांत 8 गडी गमावून 289 धावा उभारल्या. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सने 5 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
भारत – 50 षटकांत 8 बाद 289 धावा. (शुभमन गिल 130, इशान किशन 50, शिखर धवन 40, लोकेश राहुल 30, ब्रॅड इव्हान्स 5-54).
झिम्बाब्वे – 49.3 षटकांत सर्वबाद 276 धावा. (सिकंदर रझा 115, सिन विल्यम्स 45, ब्रॅड इव्हान्स 28, आवेश खान 3-66, अक्सर पटेल 2-30, कुलदीप यादव 2-38, दीपक चहर 2-75, शार्दुल ठाकूर 1-55)