ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कवी, लेखक, भाषांतरकार, निबंधकार व समीक्षक गोविंद विनायक ऊर्फ विंदा करंदीकर यांचा आज जन्मदिन. मराठी नवकवितेत एक स्वतंत्र स्थान निर्माण करणारे कवी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील धाळवली गावात 23 ऑगस्ट 1918 रोजी झाला. विंदांचे वडील विनायक हे कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते खूपच संवेदनशील होते.
त्यांनी हैदराबादमुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरूंगवासही भोगला. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे वेतन कधी स्वीकारले नाही. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते खूपच संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयंसंघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला. त्यांची विचारसरणी साम्यवादाकडे झुकणारी होते. मात्र ते अशा कोणत्याही राजकीय किंवा वैचारिक संघटनेचे सभासद झाले नाहीत.
चरितार्थासाठी त्यांनी अध्यापकी पेशा स्वीकारला होता. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एसआयईएस कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी 1976 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली, त्याचे कारण म्हणजे त्यावेळी शैक्षणिक आकृतिबंध बदलणार होता व त्यामुळे त्यांचे विद्यार्थी असलेले दोन कनिष्ठ प्राध्यापक नोकरीस मुकणार होते. त्यांची नोकरी जाऊ नये म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांच्या पत्नीने लिहिलेल्या “रास’ या पुस्तकात हा उल्लेख आहे. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर या लेखिका होत्या. विंदांचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी होते. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.
विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवींनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच काव्यवाचन हा प्रयोग यशस्वीपणे राबविला. संपूर्ण महाराष्ट्रात या त्रयीच्या एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम झाले व ते लोकप्रिय झाले होते. आचार्य भागवत यांच्याकडे विंदांचे पहिले काव्यवाचन झाले. वर्ष 1949 मध्ये पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांनी पहिले जाहीर काव्यवाचन केले.
वर्ष 1949 मध्ये मे महिन्यात विंदांचा “स्वेदगंगा’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. या कवितासंग्रहात कवितांची सामाजिक आशयाची कविता, व्यक्तिचित्रणात्मक, प्रेमविषयक, बालजीवनविषयक, चिंतनात्मक, देवगड-राजापूरकडील बोलीभाषेतील कविता असे अनेक प्रकार आढळतात. वर्ष 1954 मध्ये त्यांचा “मृद्गंधा’ कवितासंग्रह प्रकाशित झाला. या कवितासंग्रहात एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य, मिश्किलपणा असे सर्वस्पर्शी विषय आहेत.
देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना “अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले. 14 मार्च 2010 रोजी त्यांचे निधन झाले.