प्रशासनाचे दुर्लक्ष; भाडे आकारूनही विक्रेत्यांना सुविधा नाहीत
येरवडा – येरवडा येथील “सौ. शीला राज साळवे भाजी मंडई’ मध्ये गेली अनेक दिवसांपासून कचरा पडलेला आहे. यातून दुर्गंधी सुटत असून भाजी मंडईचा कचरा डेपो झाला आहे का? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. भाजी विक्री करणाऱ्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून प्रचंड दुर्गंधी सुटल्याने भाजी विक्रेते तसेच ग्राहक त्रस्त आहेत.
येरवडा येथील “सौ. शीला राज साळवे भाजी मंडई’ येथे परवानाधारक विक्रेत्यांसाठी भाजी मंडई बांधण्यात आली आहे. येथील विक्रेत्यांकडून महापालिका महिन्याला भाडेही आकारते. मात्र, कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याचे येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. अंतर्गत परिसर अस्वच्छ, रस्ते उखडलेले तसेच पिण्याच्या पाण्याचीही सोय पालिकेकडून करण्यात आलेली नाही.
याबाबत पालिका प्रशासन, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, मंडई विभाग तसेच लोकप्रतिनिधींकडेही अनेक वेळा याबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र, काहीच फरक पडला नाही. मंडईमधील कचरा उचलला जात नसल्याने येथे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंडईतील ओल्या कचऱ्याबरोबर साचलेला सुका कचरा उचलण्यात यावा, अशी माफक अपेक्षा भाजी विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी कारवाई करावी…
भाजीमंडईतील अनेक गाळे मोकळे असल्याने परीसरातील नागरिक याचा वापर जुगार खेळणे, दारु पिण्यासाठी करीत आहेत. भरदिवसा येथे दारु अड्डा रंगत आहे. यातुन अनेकदा भांडणेही होतात. मटक्याचा अड्डाही येथे भरतो. यामुळे भाजीमंडई नेमकी कशासाठी? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. याबाबत तक्रार करणाऱ्या भाजी विक्रेत्याला धमकावले जाते तसेच त्याच्या भाजीच्या गाड्यांची तोडफोड केली जाते. यामुळे याबाबत कोणीही तक्रार करीत नसल्याने पोलिसांनीच या प्रश्नी लक्ष द्यावे, अशी मागणी भाजी विक्रेत्यांनी केली आहे.