कराड – यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात तरुणांची शक्ती उभा करून त्या माध्यमातून महाराष्ट्र प्रगतीपथावर नेण्याचे काम केले. परंतु, याच महाराष्ट्रात आज जातीयवाद्यांकडून लोकशाहीच्या माध्यमातून चालणारे सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला आपल्यातील काही व्यक्ती, समूह बळी पडले. मात्र, राज्यात उलथापालथ करणाऱ्यांना जनताच जागा दाखवील, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. राज्यात पुन्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनुसारच मार्गक्रमण करत महाराष्ट्र प्रगतीपथावर आणून सर्वसामान्य, कष्टकऱ्यांचे राज्य आणू, असे प्रतिपादन केले. येथील प्रीतिसंगमावरील कै. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे शरद पवार यांनी त्यांच्या समर्थकांसह सोमवारी दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यानंतर जनसमूहास संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. रोहित पवार, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सारंग पाटील, सत्यजित पाटणकर आदींची उपस्थिती होती.
शरद पवार म्हणाले, “”राज्यात व देशात सध्या जात-धर्म-पंथ याच्या आधारे माणसामाणसांमध्ये संघर्ष कसा होईल, याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. मध्यंतरी लोकशाही, बंधुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या कोल्हापूर, नांदेड, संगमनेर, अकोला याठिकाणी सनातनी विचारधारा असणाऱ्यांनी वैरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जातीय दंगे झाले. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. अशा समाजविघातक प्रवृत्तीविरोधात खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.”
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांना एकत्रित केले. राज्याची सेवा करणाऱ्या या कर्तृत्ववान सरकारला येन-केन प्रकारे उलथून टाकण्याचा प्रयत्न केला. देशात अनेक ठिकाणी असा प्रयत्न झाला. त्याठिकाणी जातीवादी विचारांचे सरकार आणून गांधी- नेहरूंच्या विचारांनी चाललेल्या राज्यातील सरकार उलथवून टाकले. तसेच या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू- फुले- आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनुसार लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या राज्यातील पक्षाला धक्का देण्याचे काम जातीयवाद्यांनी केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात उलथापालत करण्याची भूमिका याच प्रवृत्तीने घेतली. त्याला आपल्यातील काही व्यक्ती, समूह बळी पडले. ते बळी पडले असले, तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले- आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील. पण, महाराष्ट्रातील सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. तसेच उलथापालथ करणाऱ्या शक्तीलाही त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. वर्ष-सहा महिन्यांत लोकांसमोर पुन्हा जाण्याची संधी येईल. त्यावेळी राज्याराज्यांतील लोकशाही मार्गाने चालणारे लोक उलथापालथ करून धक्का देणाऱ्या प्रवृत्तीला बाजूला करतील. महाराष्ट्र प्रगतीच्या व सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीने कष्टकऱ्यांचे राज्य येईल, अशी परिस्थिती निर्माण करू, असेही त्यांनी सांगितले.
लोकशाही विचारांचे सरकार आणणार
आज योगायोगाने गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. कै. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसारखे ऊर्जास्थळ संबंध महाराष्ट्रात नाही. तुमच्या- माझ्या सर्वांच्या गुरुच्या स्तरावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा अधिकार एकाच व्यक्तीला होता. ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन करूनच आज नव्याने त्यांच्या विचारांनुसार राज्यात लोकशाही विचारांचे सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.