हैदराबाद :- वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख वाय.एस.शर्मिला यांनी मंगळवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे खासदारकी पुन्हा बहाल झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यामुळे कॉंग्रेसला तेलंगणात वायएसआर तेलंगणाच्या रूपाने मित्रपक्ष मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी असणाऱ्या शर्मिला यांनी केलेले ट्विट लक्षवेधी ठरले. त्यांनी राहुल यांचे अभिनंदन करतानाच मोदी सरकारविरोधात लोकसभेत मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला नैतिक पाठिंबा दर्शवला. त्यातून कॉंग्रेस आणि वायएसआर तेलंगणा या पक्षांची आगेकूच हातमिळवणीच्या दिशेने सुरू असल्याचे सूचित झाले.
कर्नाटकमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये बाजी मारून कॉंग्रेसने सरकार स्थापन केले. त्यानंतर शर्मिला यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळीच कॉंग्रेस आणि वायएसआर तेलंगणामधील जवळीक वाढू लागल्याची कुजबूज सुरू झाली. आता शर्मिला यांच्या ट्विटमुळे त्या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले आहे.
तेलंगणात चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत सत्तारूढ भारत राष्ट्र समिती, कॉंग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत अपेक्षित आहे. वायएसआर तेलंगणाची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली. त्यामुळे तो पक्ष अद्याप निवडणुकीला सामोरा गेलेला नाही. आगामी निवडणुकीत पहिल्यांदाच तो पक्ष आपली ताकद आजमावेल.