मुंबई : राज्याच्या दृष्टीने चिंता वाढवणारी बातमी आता समोर येत आहे. कारण संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट निर्माण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे. या सगळ्यात सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण मराठवाड्यात सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ 36 टक्के पाऊस पडला आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली मोठी तूट निर्माण झाली आहे. सरासरीच्या उणे 20 टक्क्यांहून अधिक तूट आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहेत. 1 जूनपासून जालन्यात फक्त 54 टक्के पाऊस, सांगली जिल्ह्यात फक्त 56 टक्के पाऊस, अमरावतीत सरासरीच्या फक्त 69 टक्के पाऊस झाला आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी दिल्यानंतर, सगळ्यांना आता पावसाची वाट बघावी लागत आहे. त्यातच हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार आहे. 8 ते 21 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात सरासरीइतका किंवा त्याहून जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.