गयाना :- हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा आज यजमान वेस्ट इंडिजशी तिसरा टी-20 सामना होत आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन सामने जिंकून वेस्ट इंडीजने 2-0 अशी आघाडी घेतली असून आजचा सामना जिंकल्यास ते मालिकाही जिंकतील. मात्र, या मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतासाठी या सामन्यातील विजय अत्यंत अत्यावश्यक बनला आहे.
वेळ – संध्याकाळी 8 पासून
ठीकाण – गयाना
थेट प्रक्षेपण – डीडी स्पोर्टस
पहिल्या दोन्ही लढतीत भारतीय फलंदाजांनी साफ निराशा केली. गोलंदाजी चमकदार कामगिरी झाली असली तरीही मोटी धावसंख्याच उभारण्यात अपयश आल्याने गोलंदाजांच्या कामगिरीवरही मर्यादा आल्या.
सलामीवीर शुभमन गिलचे दोन्ही सामन्यातील अपयश जास्तच कुपत आहे. इशान किशन सातत्य दाखवत असला तरीही अनावश्यक फटकेबाजीच्या प्रयत्नात तो स्वस्तात बाद होत आहे. सूर्यकुमार यादवचा बहर पूर्णपणे ओसरला आहे.
संजू सॅमसनच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव आहे. त्यामुळे मधल्या फळीत भक्कम फलंदाजी करेल अशी अपेक्षा केवळ पदार्पणवीर तिलक वर्माकडूनच करावी लागत आहे. त्याने पहिल्या दोन्ही सामन्यात सरस खेळ केला मात्र, अन्य फलंदाजांनी साथ न दिल्याने हे दोन्ही सामने भारतीय संघाला गमवावे लागले. गोलंदाजीतही मुकेश कुमार, कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. मात्र, त्यांच्या पाठीशी धावांचे पाठबळ नसल्याने त्यांचे स्पेल संपल्यावर वेस्ट इंडीजच्या फलंदाजांसाठी धावांचा वेग वाढवणे सोपे ठरत आहे.
दुसरीकडे कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही गमावल्यानंतरचा हा वेस्ट इंडिज संघ एकदम बळकट वाटू लागला आहे. त्यांनी पहिले दोन सामने जिंकताना भारतीय फलंदाजीवर जे वर्चस्व राखले ते निश्चितच कौतुकास्पद आहे. कर्णधार रोवमन पॉवेलसह निकोलस पूरनही भरात आहेत. त्यामुळे आजचा तिसरा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्यासाठीच ते मैदानात उतरतील.
2016 सालानंतर त्यांना पहिल्यांदाच भारताविरुद्धची टी-20 मालिका जिंकण्याची संधी चालून आली आहे. भारतीय संघात सेकंड बेंच सक्षम आहे असे बोलले जात होते मात्र, टी-20 मालिकेत त्याचा फोलपणा उघड झाला आहे. तिलक वर्मासह काही प्रमाणात इशान व कर्णधार पंड्याच थोडेफार यशस्वी ठरले आहेत.
गोलंदाजी सशक्त असली तरीही अद्याप भारताला पहिल्या पाच क्रमांकावरील फलंदाजांचेच अपयश भोवले आहे. आता या तिसऱ्या सामन्यात संघात काही बदल होणार का किंवा गिल, इशान, सूर्यकुमार यांच्यावरच विश्वास कायम ठेवला जाणार यावरच या मालिकेतील भारताचे आव्हान टीकणार आहे.
जयस्वालला संधी मिळणार का..?
गिल व इशान फारशी चमक दाखव शकले नसल्याने भरात असलेला सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालला आजच्या सामन्यात संधी मिळणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेपासून आतापर्यंत झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कमालीचे सातत्य राखले आहे, त्यामुळे त्याचा अंतिम संघात समावेश करण्यात आला तर भारताची फलंदाजीची बरीचशी समस्या दूर होणार आहे.
अक्सरच्या जागी कुलदीप हवा..?
डावखउरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवत कर्णधार पंड्याने काय साध्य केले असा प्रश्न निर्माण होत आहे. कुलदीप प्रचंड भरात असताना व त्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर राखलेले वर्चस्व पाहता आजच्या सामन्यात अक्सर पटेलच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला तर संघाच्या विजयाच्या आशा वाढतील. पटेलला मिळालेल्या संधीचा लाभ घेता आलेला नसल्याने पंड्या संघात किमान दोन बदल करेल व गिलच्या जागी जयस्वाल आणि पटेलच्या जागी कुलदीपला खेळवेल अशी शक्यता आहे.