मुंबई : देशात कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी काही अटी घालून दिल्या गेल्या आहेत. त्यात महत्वाची अट म्हणजे अपत्य केवळ दोनच असावे. मात्र सध्या सोशल मीडियावर एका बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे. तीन अपत्ये असल्यामुळे निवडणूक लढवता येत नाही, त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, अशा आशयाचे बॅनर सध्या औरगांबादच्या गुलमंडी परिसरात झळकले आहेत. हे बॅनर रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने लावले आहेत.
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरची सध्या औरंगाबादमध्ये जोरदार चर्चा आहे. “औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक २०२२. मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. यासाठी जातीची कोणतीही अट नाही. वय वर्ष २५ ते ४० अविवाहीत, विधवा, घटस्फोटित चालेल. फक्त २ पेक्षा जास्त अपत्ये असणारी चालणार नाही,” असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. या बॅनरवर त्यांनी त्यांचा संपर्क क्रमांक देखील टाकला आहे.
“माझी राजकारण यायची इच्छा होती. परंतु मला तीन अपत्ये असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. मी फार जुना कार्यकर्ता आहे, त्यामुळे नगरसेवक पदाची निवडणूक तरी लढवावी असं मला वाटलं. आता मी तर निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मी विचार केला की लग्न करायचं, बायकोला निवडणुकीत उभं करायचं आणि निवडून आणायचं,” अशी प्रतिक्रिया या बॅनर लावलेल्या रमेश पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिल्ली आहे.