पाथर्डी (प्रतिनिधी) – तालुक्यातील देवराई सोसायटीच्या निवडणुकीनंतर निघालेल्या मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्यात अजय गोरक्ष पालवे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत इतरही पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी बाळासाहेब जगन्नाथ पालवे यांच्या जबाबावरून पोलिसांनी अनिल एकनाथ पालवे याचेसह सोळा लोकांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात खून व खुनाचा प्रयत्न करणे, आर्म अॅक्ट यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्परता दाखवत घटनेतील 10 आरोपींना बारा तासांत अटक केली आहे.
देवराईच्या सोसायटीच्या निवडणुकीत चुलत भाऊ गोरक्ष भानुदास पालवे हा बालाजी शेतकरी विकास मंडळाकडून उभे होते. बालाजी शेतकरी विकास मंडळाच्या 13 पैकी 11 जागा निवडून आल्या. त्यानंतर विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली होती. देवराई स्टँडवरून निघालेली मिरवणूक वृद्धेश्वर रस्त्याने दोनशे मीटर अंतरावर गेली असताना पराभूत मंडळाचे लोकांनी पूर्व नियोजनाने धारदार शस्त्राने अचानक हल्ला केला. तलवार, सुरा, लोखंडी, कुर्हाड, लाकडी दांडके, काठ्या आदी शस्त्रांचा वापर हल्ल्यात करण्यात आला.
या हल्ल्यात अजय गोरक्ष पालवे हे गंभीर जखमी झाले. नगरच्या शासकीय रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. बाळासाहेब पालवे यांच्यासह मनोहर नवनाथ पालवे, वैभव कैलास पालवे, विष्णू कैलास पालवे, संकेत पालवे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी अनिल एकनाथ पालवे, सुनील एकनाथ पालवे, ओमकार उर्फ ओम विष्णु बडेे, आकाश सुनिल पालवे, गणेश सुनिल पालवे, पुष्पा सुनिल पालवे, सविता अनिल पालवे, संतोष रामदास पालवे, संजय विष्णु पालवे, आकाश संजय पालवे, सुरेश महादेव पालवे, आजिनाथ पाटीलबा पालवे, अक्षय संभाजी पालवे, अंबादास सदाशिव पालवे, भाऊसाहेब शिवाजी (नाथा) पालवे, उत्कर्ष किरण जाधव अशा 16 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर देवराई गावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी कल्याण-विशाखापट्टणम हायवेवर सुमारे तीन तास रास्तारोको करून गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुनील पालवे, संतोष पालवे, अंबादास पालवे, संजय कारखेले, आकाश पालवे, सविता पालवे, अनिल पालवे, दिनकरराव पालवे, अक्षय पालवे यांना अटक केली.