मुंबई: महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांमध्ये वाईन शॉप बंदच ठेवण्याचा निर्णय तेथील जिल्हा प्रशासनाने घेतला आहेत. सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा आणि अमरावती हे ते पाच जिल्हे आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून करोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेणे अत्यावश्यक ठरले होते असे त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्येही 17 मे पर्यंत ही दारूबंदी कायम राहणार असून तो पर्यंत या जिल्ह्यांमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीलाच अनुमती दिली जाणार आहे. औरंगाबाद मध्ये अनेक दारू उत्पादन करणारे कारखाने आहेत. त्यांना त्यांचे उत्पादन सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. पण त्याची त्यांना या जिल्ह्यांमध्ये विक्री करता येणार नाही.
नागपुर महापालिकेनेही त्यांच्या हद्दीत वाईन शॉप सुरू करण्यास अनुमती नाकारली आहे. तथापी नागपुर ग्रामीण मध्ये मात्र वाईन शॉप सुरू राहणार आहेत. दारू विक्रीतून राज्याला मोठा महसूल मिळत असतो. सन 2019-20 या वर्षात राज्याला तब्बल 45 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.