मुंबई – ६ जूननंतर आमच्याकडे इनकमिंग सुरू होईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात अनेकजण आहेत. माझ्याही संपर्कात आहेत. आमच्याच नियमित चर्चाही होते. योग्यवेळेला योग्य निर्णय घेण्याची शिंदेंची स्ट्रॅटेजी आहे. त्यानुसार ते निर्णय घेतील, असा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा दावा केला आहे.
संजय शिरसाट म्हणाले, अजितदादांकडेसुद्धा अनेकजण येणार आहेत. कारण, आता शरद पवार गटाला कंटाळले आहेत. त्या गटात चाललेली हुकूमशाही, मीपणा आणि अहंभाव यामुळे आमदार कंटाळले. ते अजित दादांच्या संपर्कात आहेत.
दरम्यान, २० जून २०२२मध्ये शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे त्यांच्या काही आमदारांसह बाहेर पडले. त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मूळ शिवसेनेचा दर्जा दिला. बरोबर वर्षभराने म्हणजेच १ जुलै रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून सत्ताधारी पक्षाला समर्थन दिले.
यामुळे राष्ट्रवादीतही दोन गट निर्माण झाले. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणात सत्तासंघर्ष निर्माण झाला. या सत्तासंघर्षामुळे लोकसभा निवडणूक चुरचीशी ठरली. ऐनवेळी अनेक इच्छूक उमेदवारांनी पक्षांतर केले.
त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही गेले. आता विधानसभा निवडणुकीतही तेच होणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक प्रचंड चर्चेची आणि हायवोल्टेज राहणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षात कोण जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.