मुंबई – घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील प्रमुख आरोपी भावेश भिंडे याला न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. न्यायालयाने भावेश भिंडेची कोठडी २९ मे पर्यंत वाढवली आहे. दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतल्या घाटकोपरमध्ये एक होर्डिंग कोसळून १७ जणांचा बळी गेला होता.
या दुर्दैवी घटनेनंतर मुंबई पोलिसांनी त्याला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक केली होती. भावेश भिंडेंची जाहिरात कंपनी दुर्घटनाग्रस्त होर्डिंगचे संचालन करत होती. होर्डिंग दुर्घटनेनंतर भिंडे फरार झाला होता. मात्र पोलिसांनी उदयपूरपर्यंत त्याचा माग काढला आणि त्याच्या मुसक्या आवळून आज (२६ मे) न्यायालयासमोर हजर केले.
मुंबईत १३ मे रोजी वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर लावलेले होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेला होता. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे होर्डिंग लावले होते. भावेश भिंडे हा त्या कंपनीचा संचालक असल्याने त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दुर्घटनेनंतर पोलीस भावेश भिंडेचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याच्या मुलूंड येथील राहत्या घरी जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांची धाड पडण्यापूर्वीच तो फरार झाला. पोलिसांनी त्याचं शेवटचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की तो लोणावळ्यात आहे.
त्यानुसार पोलीस लोणावळ्याला गेले. मात्र तो तिथूनही फरार झाला. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १६ मे रोजी त्याला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक केली आणि मुंबईत आणले.