Rahul Gandhi | Lok Sabha Election 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मोजकेच अब्जाधीश बनवले, आम्ही देशात कोट्यवधी सर्वसामान्यांना लखपती घडवणार, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणाही केल्या.
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार बुधवारी (24 एप्रिल) संपत असल्याने येथील आठ मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार निशाणा साधला.
परतवाड्यातील सभेत राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकारने देशातील ठराविक उद्योगपतींच 16 लाख कोटीचे कर्ज माफ केले. मात्र गरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. परंतु काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यास देशातील कोट्यवधी सर्वसामान्यांना लखपती बनविण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे सर्वात अगोदर महालक्ष्मी योजना लागू करण्यात येईल. त्यानुसार, देशातील गरीब कुटुंबांची यादी बनवली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यात इंडिया आघाडीचे सरकार वर्षाला 1 लाख रुपये टाकेल.
तर, महिन्याला 8 हजार 500 रुपये देशातील कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. अंगणवाडीच्या महिलांना दुप्पट पगार दिला जाईल, अशी घोषणा राहुल गांधींनी केली. मोदींनी देशातील युवकांना 2 कोटी नोकरीचे अमिष दाखवले.
मात्र, गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आज भारतात आहे. गरिबांची लेकरं नोकरीच्या शोधात भटकत आहेत. त्यामुळे देशातील श्रीमंत लोक आपल्या मुलांना जी सुविधा देतात, तीच सुविधा आम्ही गरिबांच्या लेकरांना, देशातील युवकांना देणार, देशातील सर्वच पदवीधरांना आम्ही अप्रेंटीशीप देणार आहोत.
त्यानुसार 1 वर्षाची नोकरी गॅरंटी स्वरुपात दिली जाणार आहे. खासगी, सरकारी, सार्वजनिक क्षेत्रात ही नोकरी दिली जाणार असून बँक खात्यात या नोकरीच्या माध्यमातून वर्षासाठी 1 लाख रुपयेही दिले जाणार आहेत.
शेतकऱ्यांची अनेकदा कर्जमाफी करणार
नरेंद्र मोदींनी 10 वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही, मात्र आम्ही सरकारमध्ये येताच शेतकऱ्याचे कर्ज माफी करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी आम्ही आयोग बनवणार आहोत. हा आयोग शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भात सरकारला माहिती देईल.
त्यामुळे शेतकऱ्यांना एकदा नाही तर अनेकदा कर्जमाफी दिली जाईल. जर अब्जाधीशांचे कर्ज माफ होऊ शकते, तर शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.