मुंबई – मागील तीन वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचे प्रकरण सुरू आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या बाबतीत एक याचिका नव्याने दाखल करण्यात आली आहे. यावर पुढील महिन्यातील 21 ऑगस्ट रोजी राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी 21 ऑगस्टला पार पडणार आहे. तसेच राज्य सरकारला न्यायालयाने 21 तारखेला मत स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर सर्वप्रथम निर्णय व्हावा. त्यानंतर आलेल्या यादीचा विचार केला जावा, असे याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी म्हटले आहे.
विधान परिषदेच्या 12 आमदारांचे हे प्रकरण जून 2020 पासून प्रलंबित आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टातही सुनावण्या झाल्या आहेत. कोर्टाच्या कचाट्यात सापडलेले हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात आले आहे.
या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते रतन सोली यांना याचिका मागे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिली होती. परंतु याचिकाकर्ते सुनील मोदी यांना उच्च न्यायालयात दाद मागायची असल्यास मागा, असेही म्हटले होते. त्याप्रमाणे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.