नवी दिल्ली – पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजपने एकत्र येऊन 2015 यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले. त्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी महत्वपूर्ण दावा केला. पीडीपीचे संस्थापक मुफ्ती महंमद सईद यांनी सरकार स्थापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे पूर्वअट मांडली होती. केंद्र सरकार घटनेचे कलम 370 हटवणार नाही या आश्वासनाची हमी सईद यांनी मागितली होती, असे त्या म्हणाल्या.
सईद यांच्या कन्या असणाऱ्या मेहबुबा पीडीपीच्या 24 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. सईद यांनी 370 व्या कलमावरून भाजपचे हात बांधले. मात्र, त्या पक्षाने दिलेले आश्वासन पाळले नाही, असा आरोप मेहबुबा यांनी केला.
जम्मू-काश्मीरशी संबंधित विशेष घटनात्मक तरतुदी रद्द करून भाजपने काय मिळवले? देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी येथे राष्ट्रध्वज फडकावला त्यावेळी हजारों काश्मिरी उपस्थित होते.
आज भाजपकडून राष्ट्रध्वज फडकावला जातो त्यावेळी कुणीच काश्मिरी उपस्थित नसतो. केवळ सुरक्षा जवान उपस्थित असतात, असे त्यांनी म्हटले. हिंसाचारग्रस्त मणिपूरचा संदर्भ घेऊन मेहबुबा यांनी भाजपला टीकेचे लक्ष्य केले. मणिपूर केवळ ट्रेलर आहे. खरी फिल्म अजून सुरू व्हायची आहे. भाजपला संपूर्ण देशाचे रूपांतर मणिपूरमध्ये करायचे आहे. देश वाचवायचा असेल तर विरोधकांनी एकत्रित रहावे. त्यांनी नंबर गेममध्ये अडकू नये, असे आवाहन त्यांनी केले.