पुणे : ऐन दिवाळीत राज्यात सुरू असणाऱ्या सत्तास्थापनेच्या रंगपंचमीत कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी आणखी रंग भरले. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून ठोस प्रस्ताव आल्यास पक्ष त्यावर विचार करेल, असे ते म्हणाले. त्यामुळे सत्तेतील वाट्यावरून भाजपा सेनेतील कलगी तुऱ्यात आणखी गंमत येणार असल्याचे मानले जात आहे.
भाजपा आणि शिवसेनेने युती करून विधानसभा निवडणूक लढवली. त्यात अनुक्रमे 105 आणि 56 जागा पटकावल्या. मात्र सत्तास्थापनेच्यावेळी त्यांच्यात चढाओढ सुरू आहे. मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचे आधी ठरले, नंतर ते नाकारले, असे काहीसे या वादाचे स्वरूप आहे, असे चव्हाण म्हणाले. आम्हाला अद्याप कोणताही ठोस प्रस्ताव शिवसेनेकडून आलेला नाही. त्यासाठी आम्ही पुढाकार घेणार नाही. पण, असा ठोस प्रस्ताव आला तर आम्ही त्यावर विचार करू आणि त्याबाबत पक्षश्रेष्टींशी चर्चा करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही निवडणूक कॉंग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी करून लढवली होती. त्यामुळे चर्चा करायचीच झाली तर प्रस्ताव दोन्ही कॉंग्रेसकडे पाठवायला हवा, असेही त्यांनी सुचवले. आघाडीत कॉंग्रेसला 44 तर राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या आहेत. चव्हाण यांनी स्पष्ट केलेल्या या भूमिकेनंतर शिवसेना काय भूमिका घेते याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्र आल्यास ते बहुमत सिध्द करू शकतात. मात्र आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला आहे, तो आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना कोणती भूमिका घेते यावर पुढील राजकीय समिकरणे अवलंबून असणार आहेत.