श्रीनगर : कडकडीत बंद, शहरात आणि खोऱ्यात ठिकठिकाणी नागरिकांची सुरक्षा दलांशी उडालेली चकमक अशा पार्श्वभूमीवर युरोपीयन महासंघाच्या 23 प्रतिनिधीच्या शिष्टमंडळाचे काश्मिरातील स्थिती पाहण्यासाठी आगमन झाले. विमानतळापासून सुरक्षा जवानांच्या वाहनांच्या गराड्यात बुलेटफ्रूफ गाड्यांतून हे सदस्य त्यांच्या हॉटेलपर्यंत पोहोचले. तेथे त्यांचे पारंपरिक काश्मिरी पध्दतीने स्वागत करण्यात आले.
जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम आणि पोलिस प्रमुख दिलबाग सिंग यांनी युरोपीयन संससद सदस्यांना खोऱ्यातील स्थितीची माहिती दिली. काश्मीरचे विभाजन करून त्यानंतर त्याचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर प्रथमच परदेशी उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे काश्मीरात आगमन झाले आहे. या शिष्टमंडळाने त्यांच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नवनिर्वाचित सदस्यांशीही चर्चा केली. शहरावर थंडीची लाट पसरली असताना काही सदस्यांनी प्रसिध्द दाल सरोवरमध्ये बोटींगही केले.
विर्जीनी जोरान या युरोपीयन महासंघाच्या फ्रान्समधील सदस्य म्हणाल्या, ही भेट खूप उत्तम झाली. काश्मिरमधील स्थितीची आम्हाला माहिती मिळाली. स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. बारामुलाचे उपनगराध्यक्ष अबिद सलाम म्हणाले, एकमेकांच्या कल्पना समजाऊन घेण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ होते. काश्मिरमधील शांतता आणि विकास याबाबत चर्चा झाली.
शहरात आणि खोऱ्यात दगडफेकीच्या काही घटना घडल्या त्यात पाच जण जखीं झाले, अशीमाहिती सरकारी सुत्रांनी दिली. तर शहर आणि खोऱ्यात या तणावामुळे दुकाने आणि व्यवहार ठप्प होते. या पार्श्वभूमीवर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरवात झाली. विद्यार्थ्यांचे पालक परीक्षा केंद्राबाहेर थांबून होते.
या पथकात सुरवातीला 27 सदस्य होते. मात्र त्यातील चार सदस्य व्यक्तीगत कारणांमुळे मायदेशात परतले. जम्मू काश्मिरसह देशाच्या विविध भागांना या सदस्यांची भेट फलदायी होईल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत करताना व्यक्त केला होता. जम्मू काश्मिरच्या भेटीमुळे जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैविध्याचा अनुभव घेता येईल. या विभागाच्या विकासासाठी सरकारचा दृष्टीकोन समजावून घेण्यास मदत होईल, असे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.