मुंबई – मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर जालन्यामधील अंतरवाली सराटी गावात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले. यात महिलांचा देखील समावेश आहे.अशात या सर्व घडामोडीवर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. या हल्ल्यात जे जखमी झाले त्यांची मी सरकारच्यावतीने क्षमा मागतो अशा शब्दात दिलगिरी व्यक्त केली.
ही घडलेली घटना चुकीचीच आहे जालन्यातील या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती देखील यावेळी फडणवीस यांनी दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्तपणे मराठा आरक्षणाबवर पत्रकार परिषद घेतली.
जालन्यातील घटनेवरून राजकारण सुरु आहे असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच सरकारने मराठा आरक्षणासाठी वटहुकूम काढावा अशी मागणी केली होती. या मागणीवर बोलताना ‘तुम्ही मुख्यमंत्री असताना वटहुकूम का काढला नाही ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच ओबीसी समाजाइतक्याच योजना आमचे सरकार मराठा समाजाला देत असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत तोडगा निघाल्याची चर्चा झाल्याचे समजते. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणा संदर्भात काहीतरी ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितलं.