मुंबई – गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सरटी गावात शुक्रवारी हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसाचारात 40 पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले आणि राज्य परिवहनच्या 15 हून अधिक बसेस जाळण्यात आल्या.
पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी विचारले की “मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून कोणी फोन केला? स्थानिक पोलिस कधीही आदेशाशिवाय लाठीमार आणि गोळीबार करणार नाहीत. फोनद्वारे ते आदेश कोणी दिले हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे जनरल डायरच्या मानसिकतेने काम करत आहेत असा आरोप राऊत यांनी केला. त्यांनीच शांततेत उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि गोळीबार करण्याचे आदेश दिले, असा आरोप राऊत यांनी केला.
जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून दोन डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली. शिंदे म्हणाले की, एडीजीपी (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना लाठीचार्जच्या घटनेची चौकशी करतील आणि गरज पडल्यास न्यायालयीन चौकशी केली जाईल.