पुणे -नव्याने समाविष्ट 23 गावांच्या विकास आराखड्यासाठी भाजपने बोलविलेल्या खास सभेवरून महापालिकेतील विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत.
यापूर्वी 11 गावे समाविष्ट झाले तेव्हा भाजपला सभा बोलवावी वाटली नाही. मात्र, आता 23 गावांसाठी विरोधीपक्षांना विश्वासात न घेता बोलविलेल्या या बैठकीत काही तरी गौडबंगाल असल्याची टीका विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे.
धुमाळ म्हणाल्या, या गावांच्या नियोजनात्मक विकासासाठी राष्ट्रवादी कटीबद्ध आहे. त्यावर सकारात्मक चर्चा आणि बैठकांना आमचा विरोध नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला ही गावे पालिकेत येऊन अजून दोन आठवडेही लोटले नाहीत.
तोपर्यंत भाजपचे विकास आराखडा करण्यासाठी घाई सुरू केली आहे. त्यामुळे, पुढील महापालिका निवडणुकीनंतर आपली पुन्हा सत्ता येणार नाही याची कुणकुण लागल्यानेच भाजपने इतर कोणत्याही राजकीय पक्षांना साधी कल्पनाही न देता ही खास सभा बोलविली आहे.