पुणे -राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आता तिघाडीचे सरकारच बनले असून, यात कॉंग्रेसची मोठी अडचण होत आहे. कॉंग्रेसला कोणतेही निर्णय घेताना फारसे विश्वासात घेतले जात नाही. सरकारमध्ये कॉंग्रेस हा नको असलेला पाहुणा बनला आहे, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादंग निर्माण झालेला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याही वक्तव्याने वाद उफाळून येत आहेत. विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राजकीय हेतूने भाजपच्या आमदारांचे निलंबन करण्यात आले.
सभापतीपदाची निवडणूक झाकण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने भाजपचे आमदार अनुपस्थित राहावेत, यासाठीच ही कार्यवाही करण्यात आली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली सुरू आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्यामुळे प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे नाराज असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्रही सुरू केले आहे. याबाबत चर्चा सुरू असून नाराजी दूर होऊन प्रतिक्रिया थांबतील, असे मत भांडारी यांनी व्यक्त केले आहे.