मुंबई : राज्यातील कोरोनाच्या संकटावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रितक्रिया दिली आहे. मुंबईवर कोरोनाचे संकट आल्यावर परराज्यातून आलेले आता आपल्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्रात एवढी वर्ष राहिले आणि पैसे कमवले. मात्र आता संकट आल्यावर आपल्या राज्यात जाण्याचा विचार करणार. मात्र हे परप्रांतीय मुंबईतून निघून गेल्यावर त्यांची कामं कोण करणार आहे. महाराष्ट्राने परराज्यातून येणाऱ्या लोकांवर अलंबून राहण्यावर विचार करण्याची गरज आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
संकटकाळी तुम्हाला तुमचे राज्य आठवत असेल तर हे चुकीचं आहे. या सर्वांना आता महाराष्ट्रातून जाऊ नये. आज त्यांची महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. संकटकाळात ज्या राज्याने तुम्हाला सर्व काही दिलं त्याला सोडून का जात आहात? असेही राज ठाकरेंनी विचारले.
परप्रांतीयांनी महाराष्ट्रात येण्यास माझा विरोध नाही. मात्र परप्रांतीय सुरुवातीला मान खाली घालून येतात, नंतर मान वर करुन दादागिरी करतात हे चालणार नाही. नोकरी-धंदा करण्यासाठी येताय त्यांना कुणी विरोध करत नाही. मात्र एवढी वर्षे महाराष्ट्रात राहत आहात, तर इथले व्हा, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
लॉकडाऊन वाढवून प्रश्न सुटणार आहेत का? लॉकडाऊन आणखी किती दिवस वाढवणार? त्यामुळे कोरोना संपणार आहे, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. सरकारच्या नियोजनातही काही त्रुटी आहे. जीवनावश्यक वस्तूची दुकानं दिवसभरात अवघी काही तास उघडी ठेवली तर लोक गर्दी करणारच. लोकांना काही मोकळीक दिली तर लोक सर्व नियम पाळून कोरोनापासून बचाव करतील आणि सर्व सुरळीत सुरु राहिल, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.