नवी दिल्ली – करोनामुळे जागतिक स्तरावर अनेक स्पर्धांना फटका बसलेला असताना भारतीय क्रिकेटला तसेच त्या पूरक व्यवसायांना करोडो रुपयांचा फटका बसला आहे.क्रिकेटसाठी सहित्य, चेंडू वा अन्य उत्पादने बनविणाऱ्या कंपन्यांनाही प्रचंड तोटा झालेला आहे. करोनाचा धोका वाढल्याने देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने तसेच याची मुदत आणखी वाढण्याबाबतही संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पुढील किमान 3 महिने तरी क्रिकेटचे सामने होणार नाहीत हे देखील स्पष्ट होत आहे. क्रीडा साहित्य तयार करत असलेल्या कंपन्यांनाही फटका बसलेला आहे.
भारतात क्रिकेटचा खेळ अन्य कोणत्याही खेळांपेक्षा जास्त लोकप्रिय आहे. देशातील परीक्षांचा काळ संपल्यावर मार्चपासून मे महिन्याच्या अखेरच्या काळात लाखो मुले व मुली या खेळाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होत असतात. त्यांना सराव करताना क्रिकेटचे साहित्य विकत घ्यावे लागते त्यामुळे या कंपन्या देखील प्रचंड उत्पादन करत असतात. यंदा करोनामुळे याच कंपन्या तोट्यात आल्या आहेत.
साधारण जानेवारीपासून विविध कंपन्यांचे उत्पादन सुरु होते. यंदा मात्र कच्चा माल विकत घेतला गेला असला व उत्पादन उपलब्ध करण्यात आले असले तरी त्याची विक्रीच झालेली नसल्याने या कंपन्यांना करोडो रुपयांचा तोटा झालेला आहे. ही रक्कम अंदाजे 1 ते 2 हजार कोटी असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊन पुढील काळातही कायम राहिले तर या कंपन्यांना आणखी तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन कधी उठणार, याकडे या कंपन्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.