नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिराला भेट दिली. यानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर यांनी एक ट्वीट केले आहे. त्यांच्या ट्वीटने सध्या खळबळ माजली आहे. कारण त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आळ घेतला आहे.
झालं असं कि, बुधवारी राहुल गांधी हे पंजाबच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते. त्यांनी अमृतसरमधल्या सुवर्णमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब विधानसभा निवडणुकीसाठीचे काँग्रेसचे काही उमेदवारही होते. त्यानंतर गांधी यांनी संध्याकाळी जलंधर इथं भेट दिली आणि व्हर्च्युअली सभा घेतली. शीख धर्मस्थळाला भेट देताना मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा आणि ओपी सोनी हेही राहुल गांधी यांच्या सोबत होते.
Who picked @RahulGandhi's pocket at Sri Harmandir Sahib?@CHARANJITCHANNI? @sherryontopp? or @Sukhjinder_INC? These were the only 3 persons allowed by Z-security to get near him. Or is it just one more attempt to bring bad name to our holiest shrine, after the 'be-adbi' incidents?
— Harsimrat Kaur Badal (@HarsimratBadal_) January 29, 2022
दरम्यान, त्यांच्या भेटीनंतर हरसिमरत कौर यांनी एक ट्विट केले. यात त्यांनी “श्री हरमंदिर साहिब येथे राहुल गांधींचं पाकिट कोणी मारलं? चरणजीत सिंग चन्नी, नवज्योत सिद्धू किंवा सुखविंदरजी? Z-Security मुळे राहुल गांधी यांच्या जवळ जाण्याची परवानगी फक्त या तीन लोकांनाच होती. अपवित्र घटनांनंतर आमच्या पवित्र मंदिराचे नाव बदनाम करण्याचा आणखी एक प्रयत्न,” हरसिमरत कौर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मात्र त्यांनी कथित घटनेबद्दल इतर कोणतीही माहिती दिली नाही. हरसिमरत कौर यांना प्रत्युत्तर देताना, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी त्यांची पोस्ट रिट्विट करत “असे काहीही झाले नसताना अशा खोट्या बातम्या पसरवणे हे निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
सुरजेवाला यांनी हिंदीतील ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजकीय मतभेदांव्यतिरिक्त त्यांनी जबाबदारी आणि परिपक्वता दाखवली पाहिजे. तसेच नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा भाग असणे आणि शेतीच्या अध्यादेशांना मंजुरी देणे म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांचे खिसे कापण्यासारखे आहे, असे सांगून सुरजेवाला यांनीही कौर यांची खिल्ली उडवली.