Lok Sabha Election 2024 । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठी बातमी येत असून, ते यूपीमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. राहुल यांना निवडणूक लढवण्याची खात्री पटल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. आता गांधी परिवार आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना अमेठीतून निवडणूक लढवायची की रायबरेलीतून दावा सांगायचा हे ठरवायचे आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत पक्षाकडून औपचारिक घोषणा होऊ शकते, असे मानले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस अमेठी आणि रायबरेलीबाबत संभ्रमावस्थेत अडकली आहे. याआधी प्रियांका आणि राहुल दोघेही निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात होते, पण आता बातमी अशी आहे की प्रियांका गांधींनी स्वतःला शर्यतीतून बाहेर काढलं आहे आणि फक्त राहुल गांधीच राजकारणाच्या रिंगणात उतरणार आहे. राहुल गांधी यांनीही वायनाडमधून निवडणूक लढवली आहे. त्यांनी आता अमेठी किंवा रायबरेलीमधून निवडणूक लढवली आणि जिंकल्यास त्यांना एक जागा सोडावी लागेल. या कोंडीमुळे अनेक दिवस नावाची घोषणा झाली नाही. मात्र, अमेठीच्या ग्राऊंड रिपोर्टवरून राहुल गांधींबाबत वातावरण तयार होत असल्याचे निश्चितपणे दिसून येते. त्यांनी येथून पुन्हा निवडणूक लढवली तर स्मृती इराणी यांचा मार्ग सोपा असणार नाही.
तसेच रायबरेलीतही जनतेशी थेट संवाद साधला असता एक मोठा वर्ग गांधी घराण्याचा समर्थक बनल्याचे समोर आले असून कोणीही मैदानात उतरले तरी काँग्रेसचाच विजय होणार असल्याची चर्चा आहे. अशात येथूनही राहुल गांधी यांनी उमेदवारी दिल्यास काँग्रेसच्या विजयाची शक्यता वाढू शकते. मात्र, अद्यापपर्यंत भाजपने रायबरेलीच्या जागेवर आपले पत्ते उघड केलेले नाहीत.