पुणे – लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाची नजर तरुण मतदारांवर आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यामध्ये दौऱ्यावर आले असून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत. यावेळी न्याय योजनेसाठी ७२ हजार कोठून आणणार ? असा सवाल एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना विचारला. यावर राहुल गांधी म्हणाले कि, नीरव मोदी, विजय मल्ल्या, अनिल अंबानी आणि मेहुल चोक्सीकडून पैसे घेऊन गरिबांना देणार आहे.
एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना प्रश्न विचारला कि, तुम्ही २० टक्के गरिबांना ७२ हजार रुपये प्रत्येक वर्षी देण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी पैसे कोठून येणार आहेत? यावर राहुल गांधींनी उत्तर दिले कि, नीरव मोदी, विजय मल्ल्या, अनिल अंबानी आणि मेहुल चोक्सीकडून पैसे आणू. परंतु, ७२ हजार रुपये देण्यासाठी आयकर वाढवला जाणार नाही याची हमी मी देतो, सर्वसामान्यांना कोणताही फटका बसणार नाही, असे त्यांनी सांगितले.
भारतात रोज २४ हजार तरुण नोकऱ्या गमावत आहे, आपल्या देशात स्किलचा आदर केला जात नाही. तर चीन सातत्याने आपल्या देशात रोजगार तयार करत आहे. नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. नोटाबंदी एक जखम असून त्याच्यावर काहीच उपचार नाही. परंतु, आम्ही अर्थव्यवस्थाला उभारी देण्याचेच काम करू, असे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे.