मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद शरद पवार यांनी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात एकच गोंधळ उडाला आहे. कार्यकर्ते शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी विनंती करत आहेत. मात्र, शरद पवार राजीनाम्यावर ठाम राहिले. दरम्यान, आज अध्यक्ष निवड समितीची वाय. बी. सेंटरमध्ये बैठक होणार असून त्यात शरद पवारांच्या अध्यक्षपदाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत शरद पवार हे अध्यक्षपदावर राहणार आहेत कि नाही हे ठरणार आहे.
शरद पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असल्यामुळे त्यांनी निर्णय घेतल्यास समितीच्या बैठकीची आवश्यकता उरणार नाही अशी प्रतिक्रिया खुद्द समितीच्या सदस्यांनीच व्यक्त केली आहे. मात्र, शरद पवारांनीच राजीनाम्याची घोषणा करताना या समितीची घोषणा करून ही समितीच अध्यक्षपदाविषयी निर्णय घेईल, असे जाहीर केल्यामुळे आजच्या समितीच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, एकीकडे समितीची आज बैठक होणार असून त्यात शरद पवार यांचा राजीनामा किंवा नव्या अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब यापैकी एका गोष्टीवर निर्णय होण्याची शक्यता असताना दुसरीकडे शरद पवारांनी तेच अध्यक्षपदी कायम राहण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे.
गुरुवारी वाय. बी. सेंटरबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलताना शरद पवारांनी “दोन दिवसांनी तुम्हाला असं आंदोलन करायला बसावं लागणार नाही”, असे विधान केल्यामुळे तेच अध्यक्ष राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.