नवीदिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च नायायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली. ५ सदस्यीय घटनापीठाकडे आज अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे. आमदारांची अपात्रता त्यासोबतच शिवसेना कोणाची ? निवडणूक आयोग निर्णय पद्धती या सर्व गोष्टीबाबत आज न्यायालय काय भाष्य करणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना आज युक्तिवाद सुरु झाला. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने कोर्टासमोर आपले म्हणणे मांडले.
ठाकरे गटाच्या वतीने सर्व प्रश्नांचा सोक्षमोक्ष होई पर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय घेण्याबाबत विचार करावा याबाबत जोरदार पद्धतीने आपली बाजू मांडली. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करताना वारंवार १० व्या सूचीचा उल्लेख केला गेला. शिंदे गटाकडे विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही असं त्यांनी अधोरेखित केल्याचे पाहायला मिळाले.
अशात जर निवडणूक आयोगाने काही निर्णय दिला तर चित्र बदलेल यासाठी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांनी आज निवडणूक आय़ोगाने कारवाई केली आणि सर्व याचिकांचा निर्णय आमच्या बाजूने लागला तर काय होणार? अशी विचारणा खंडपीठाला केली आहे.
कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना सांगितलं की, शिंदे गटाने व्हीप धुडकावत भाजपाच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. २९ जूननंतरच हे सर्व झालं असल्याने यावर कोर्टाने निर्णय घेतला पाहिजे. आपला वेगळा गट आहोत असं ते सांगू शकत नाहीत. त्यांच्याकडे १० व्या अनुसूचीनुसार, विलीनीकरणाचा एकमेव पर्याय आहे.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी होत आहे.