…आणि बुद्ध हसला
तृष्णा सर्व दु:खांचे मूळ,
अन् मोह वेदनेचे कूळ
त्याने कधीच होते सांगितले, आम्हीही नतमस्तक,
कारण सार जीवनाचे होते पटले
पण, थांबून आम्हाला चालणार नव्हते,
“कमवून’ ठेवण्याचे ओझे खांद्यावर होते
अर्धोन्मिलित नेत्र, तो मनी उमगला
कळेल एक दिवस वदला…आणि बुद्ध हसला
“अहिंसा परमो धर्म:’ अमान्य आम्हाला कधी होते? पण कधी जीभेसाठी, तर कधी जीवासाठी
प्राणी अथवा जीवाणूंवर वार करणे अनिवार्य होते
“हक्क निसर्गावर इथल्या प्रत्येकाचा, किटक, मुंगीच काय, पण एकपेशीय सजीवाचा, हे कळणार कधी, प्रश्न त्याने पुसला
हरवले नाही बळाने तर शक्तीचा उपयोग तो कसला? युक्तिवाद माझा ऐकला
…आणि बुद्ध हसला
पण, आज जेव्हा श्वास प्रत्येक महाग झाला,
कळले की खरेदीची क्षमता माझ्या कमाईत नाही,
करूणा आणि सेवा तारताना दिसते,
ती ताकद कुठल्याही लढाईत नाही
ज्याला टीचभर समजले, तो शत्रू आज मस्तीत आहे,
जग जिंकणारा मात्र चार, भिंतीत बंदिस्त आहे
आज उमगले ते ज्ञान जगण्याचे, सुखाचे रस्ते “आत’ शोधण्याचे
मृगजळ दिसता सावध होण्याचे, अन् गरजेनंतर हक्क सोडण्याचे
चेहऱ्यावर त्याच्या तेजाचा भाव उमटला
शतकानंतर समाधानात तो दिसला
आणि पुन्हा एकदा बुद्ध हसला….
डॉ. वैशाली विनोद काकडे
नगर । संपर्क : 9421348876