मुंबई – राज्यात गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे यंदा राज्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक धरणांच्या पाणी साठ्यात कमालीची घट झाली असून, नद्या कोरड्या पडल्याने शेतकरीही हवालदील झाला आहे. तर अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे.
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील पाणीसाठा 28 टक्क्यांवर आला. त्यामुळे सध्या 2,344 गावे व 5,749 वाड्यांना 2,952 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, उन्हाचा तडाखा असाच राहिल्यास पाणीपुरवठ्याची स्थिती आणखी चिंताजनक होणार आहे. त्यापैकी सर्वात गंभीर परिस्थिती छत्रपती संभाजीनगर विभागात आहे.
सध्या राज्यातील धरणांमध्ये 28.06 टक्के पाणीसाठा असून तो गेल्यावर्षी 40.28 टक्के होता. यात सर्वाधिक धरणे ही छत्रपती संभाजीनगर विभागात असून 920 धरणे असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 35 टक्क्यांनी घटला आहे. गेल्यावर्षी येथे 46.79 टक्के पाणीसाठा होता. तो आता फक्त 11.89 टक्क्यांवर आला आहे.
राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत टँकरची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यात सध्या 2,952 टँकरद्वारे 2,344 गावे आणि 5,749 वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यापैकी 2 हजार 834 खासगी टँकर, तर 88 सरकारी टँकर आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 626 टँकरद्वारे 393 गावे, तर 59 वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
त्यापाठोपाठ जालन्यात 442, बीडमध्ये 310, नाशिकमध्ये 294, अहमदनगरमध्ये 267, सांगलीत 183, पुण्यात 169 टँकर्सनी पाणीपुरवठा सुरू आहे. मागच्या वर्षी याच काळात अवघे 101 टँकरद्वारे 111 गावे आणि 259 वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र, यंदा टँकरचा आकडा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तीन हजारांजवळ पोहोचला आहे. यावरुन पाणीटंचाईची भीषण तीव्रता लक्षात येते.