नवी दिल्ली : देशातील करोनाचा वेग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशातील मृताची संख्या ८ हजारांच्या पुढे गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत करोनामुळे ३८८ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ८१०७ वर पोहोचली आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत आतार्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १२ हजार ३७५ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ९ ते १० हजारांनी वाढणारी करोनाबाधित रुग्णांची संख्या आता १२ हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत दोन लाख ८७ हजार करोनाबाधित रुग्ण झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एक लाख ४० हजार ८७९ जणांनी करोना व्हायरसवर मात केली आहे. एक लाख ३८ हजार ६९ जणांवर उपचार सुरू आहेत. करोनाबाधितांची मोठी संख्या असलेल्या ५० देशांच्या यादीत बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणाचा विचार केल्यास भारत २९ व्या स्थानावर आहे, असे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि बेंगळूरु या सहा शहरांमध्ये केंद्रीय पथके तैनात करण्यात आली आहेत. आठवडाभर ही पथके संबंधित शहरांमधील आरोग्याच्या सुविधांचा आढावा घेऊन दररोज राज्याच्या आरोग्य मंत्रालयाला तसेच केंद्र सरकारला अहवाल सादर करतील. या भेटीनंतर संपूर्ण अहवाल केंद्राला सादर केला जाईल. १५ राज्यांमध्ये ५० केंद्रीय पथके पाठवण्यात येणार असून, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर, पालघर आणि सोलापूर या शहरांना केंद्रीय पथके भेट देणार आहेत.
दरम्यान,भारतात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.८८ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जर्मनीमध्ये सर्वाधिक ९१ टक्के आहे. मृतांच्या आकडेवारीत भारत २५ व्या स्थानावर आहे. भारतात मृतांचे प्रमाण २.८ टक्के असून, इस्रायलमध्ये ते १.६ टक्के आहे.