नीरा -पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेला नीरा ग्रामपंचायत हद्दीत दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार पुन्हा सुरू झाला आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आठवडे बाजारांमध्ये खरेदीला प्रतिसाद दिला नाही. नागरिकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. केवळ 20 टक्केच नागरिक बाजारात आले होते. तीन महिन्यानंतरही बाजाराला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विक्रेते हताश झाले आहेत.
नीरा परिसरात पुरंदर, बारामती, फलटण, खंडाळा या तालुक्यांतील लोक आठवडे बाजारात खरेदीला येत असतात. बुधवार (दि.10) आठवडे बाजार सुरू झाल्यानंतर गर्दी होईल, असा अंदाज बांधला होता. मात्र कमी गर्दी पाहायला मिळाली. खंडाळा व फलटण तालुक्यातील गावांतून जिल्हाबंदीमुळे नागरिक बाजारात येऊ शकले नाहीत.