रत्नागिरी: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेच्या घडामोडीनंतर आज भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. राणेंनी वादग्रस्त विधानामुळे झालेली अटक आणि त्यानंतर जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी यात्रेचा पुन्हा शुभारंभ केला आहे. यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला त्यांनी रत्नागिरीत सुरुवात केली आहे.
“त्या वेळेला मी तिथे असतो तर आवाज माझाच असता..असतो तर ना..जसं एका दरोडेखोराला अटक करतात, तसं केंद्रीय मंत्र्याला अटक करायला दोनशे अडीचशे पोलीस, वा काय पराक्रम आहे? महाराष्ट्रातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न घ्या आजही त्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. पूरस्थिती घ्या, चिपळूण घ्या महाड घ्या, अजून कुणालाही पैसे मिळालेले नाही.”, असे टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडले.
“नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. कसली भाषणं करता. मी मग सोडणार नाही. आता जुन्या गोष्टी काढणार, काढा ना. दोन वर्षे झाली अजूनही शोधताहेत. नाही मिळालं. आम्हालाही जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे.” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
“आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं पोराला. काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका.” असा घणाघाती सज्जड दमही त्यांनी दिला.