हिंजवडी, दि. 19 (वार्ताहर) -एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम । अनेकांचे काम नाही आता ।। मोडोनिया वाटा सूक्ष्म धुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ।।… या संत तुकाराम महाराज यांच्या अभंग उक्तीप्रमाणे भगवंताचे नाम गात आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी कोकण भागातून आलेल्या पायी दिंडीचे मुळशीतील मुलखेड गावात स्वागत करण्यात आले.
कोकणातील बोडशेत येथील आदिनाथ दिंडी दरवर्षी माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीला येते. नाक्ती महाराज पायी वारी दिंडीमधील वारकऱ्यांचे विणेकऱ्यांचे पाद्यपूजन करून मूलखेडमधील महिलांनी वारकरी सेवेचा आनंद घेतला. गेली अनेक वर्षे घोटवडे, माण बापूजीबुवा मार्गे आळंदीकडे प्रस्थान करणारी ही दिंडी गेल्या पाच दहा वर्षांपासून मुलखेड येथील प्रगतिशील शेतकरी हरिभाऊ तापकीर यांच्या कडे दुपारच्या विसाव्यासाठी येते. सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर तापकीर यांच्या परिवाराकडून दिंडीतील हजारो भाविकांना अन्नदान तसेच काही वारकऱ्यांना वस्त्रदान व ग्रंथवाटप केले जाते.
मुलखेड गावात दिंडीचे आगमन होताच ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने परिसर दुमदुमला जातो. गावातील कॉंक्रीट रस्त्यांवर रांगोळ्या काढल्या होत्या. फुलांचा वर्षाव करत वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी अनेक महिलांनी फुगड्या खेळत टाळ, मृदंगावर ठेका धरत अभंगाचा आनंद लुटला.
तापकीर कुटुंबीयांच्या घरी हभप नवनाथ महाराज माझीरे यांचे सुश्राव्य प्रवचन झाले. बळवंत महाराज जाधव यांनी स्वागत केले. दुपारनंतर गावातील शेकडो नागरिक दिंडीला दुसऱ्या गावापर्यंत पोचविण्यासाठी सहभागी झाले होते. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात चांदे, माण आयटीपार्क मार्गे ही दिंडी आळंदीकडे प्रस्थान झाली.