पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) -नवी सांगवीतील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. कर्मचारी जेवणाचा पुरवठा करण्याचे विसरल्याने रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 14 मधील महिला रुग्णांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. त्या बाबत रुग्णालयीन प्रशासन देखील अनभिज्ञ होते.
जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. पूर्वी रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातूनच रुग्णांना जेवणाचा पुरवठा केला जायचा. सकाळी तीन व सायंकाळी तीन असे एकूण सहा कर्मचारी जेवणाचा पुरवठा करत होते. रुग्णालयीन कर्मचारी संख्या कमी असल्याने जेवणाचा पुरवठा करण्यासाठी खासगी संस्थेला हे काम देण्यात आले. सध्या जेवण करण्यासाठी तीन महिला असून दोन कर्मचारी सर्व वॉर्डमध्ये जेवणाचा पुरवठा करत आहेत. ही संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेकदा वॉर्डमधील रुग्णांना जेवण देण्याचेच विसरून जात आहे.
नुकतेच रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 14 मधील रुग्णांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. रात्री 11 वाजले तरी जेवण आले नाही. त्यामुळे अनेक रुग्णांनी आपल्या नातेवाइकांना संपर्क करून जेवण आणण्याची सूचना केली. रात्री 12 नंतर अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णांना जेवण दिले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगत आहेत. त्यामुळे संबंधित जेवणाचा पुरवठा करणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्याची मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.
सहा वाजता कॅंटीन बंद
नवी सांगवी जिल्हा रुग्णालय परिसरातील कॅंटीन सायंकाळी सहा वाजता बंद होते. रुग्णालयाच्या परिसरात जवळ कुठेही हॉटेल किंवा खाण्यासाठीची सुविधा नाही. त्यामुळे रुग्णांना जेवण आणण्यासाठी लांब जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णांची गैरसोय होत आहे.
जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले आहे. रात्री 11 वाजले तरी आम्हाला जेवण दिले न्हवते. भूक लागल्याने आमच्या नातेवाइकांना जेवणाचा डबा देण्याबाबत आम्ही फोन करून सांगितले. रात्री 12 वाजल्यानंतर मला नातेवाइकांनी जेवण आणून दिले.
– मंगल कापरे, रुग्ण.
रुग्णालयातील रुग्णांना जेवणाचा डबा मिळायला उशिरा मिळाला आहे. मात्र संबंधित कर्मचारी काही वॉर्डला जेवण द्यायचा विसरला होता. त्यामुळे हा गोंधळ झाला. नंतर हा प्रकार लक्षात आल्याने संबंधितांना सूचना देऊन जेवण देण्यात आले.
– डॉ. वर्षा डोईफोडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.