कराड -गेल्या पाच दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील सुमारे पाचशेहून अधिक हातगाडाधारक संघटनेच्या सभासदांवर उपासमारीची वेळ आली आहे. हॉकर्स झोननुसार पुनर्वसन करावे या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्याधिकारी डांगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी डांगे यांनी नोंदणीकृत असणाऱ्या सर्व हातगाडाधारकांचे तपासणी करून पुढील सोमवार, दि. 9 मार्चपर्यंत पुनर्वसन करण्यात येईल. अथवा तात्पुरत्या स्वरूपात व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यामुळे संघटनेतील सदस्यांनी अजून आठ दिवस संयम पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान याप्रसंगी मुख्याधिकारी यशवंत डांगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, लक्ष्मणराव निकम, आनंदा लादे, जावेद नायकवडी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे स्वागत केले. गेले पाच दिवस आपले व्यवसायही बंद ठेवून पालिकेला सहकार्य केले. मात्र, या हातगाडा धारकांचे पोट याच व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांच्यापुढे पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आणखी काही दिवस पालिकेने निर्णय न घेतल्यास जगायचे कसे हा विचार करून सर्व हातगाडाधारकांनी आज मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना भेटण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व हातगाडाधारक सोमवारी सकाळी बसस्थानक परिसरात एकत्रित जमले. आपल्या मागण्यांचे निवेदन तयार करून मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी निघाले असता डांगे यांनी आपण स्वत:च बसस्थानक परिसरात येत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील हेही उपस्थित होते.
प्रारंभी हातागाडाधारकांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी आपल्या व्यथा मांडल्या. प्रारंभी त्यांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभागी झालेल्या कराड नगरपालिकेने शहरात अनेक बदल घडवून आणले आहेत.
शहराच्या हिताच्यादृष्टीने पालिकेने हाती घेतली अतिक्रमण हटाव मोहिमेस संघटनेचा पाठिंबा व्यक्त केला. तसेच पालिकेने आमच्या पोटा-पाण्याचाही विचार करावा अशी मागणी केली. यावेळी, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हातगाडा धारकांनी पालिकेस सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून अडचण ठरणारी अतिक्रमणे काढणे हे अत्यावश्यक होते. त्यासाठी हे पाऊल उचलले आहे. मात्र, पालिका प्रशासन कोणावरही अन्याय करणार नाही.
येत्या दोन दिवसांत पालिका पदाधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक घेण्यात येऊन निर्णय घेतला जाईल. तसेच शहरात उपलब्ध असणाऱ्या जागांचा विचार करून पुनर्वसन केले जाईल. त्यासाठी अजून आठ दिवसांचा वेळ द्यावा, अशी विनंती केली. शहराचा विचार करून अजून आठ दिवस संयम पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, दि. 9 पर्यंत काहीच निर्णय न झाल्यास आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
रविवार व सोमवार या दोन दिवशी पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम बंद ठेवण्यात आली. त्याऐवजी ज्या ठिकाणची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. त्या भागात साठलेला सर्व राडारोडा उचलण्यात पालिका कर्मचारी व्यस्त होते.
सोमवारीही अतिक्रमण मोहीम नाही