मुंबई – विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या प्रत्येकी दोन जागा व भाजप पक्षाच्या चार जागा रिक्त आहेत. एकूण दहा जागांसाठी उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मात्र भाजपने चारऐवजी पाच उमेदवार जाहीर केले असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कंबर कसावी लागेल, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले. राज्यसभेच्या निवडणुकीतही एक उमेदवार अधिक असल्यामुळे सर्व पक्षांची तयारी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
या दोन्ही निवडणुकींसंदर्भात मंगळवारी महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष व मित्र पक्षांची बैठक मुंबई येथे पार पडली आहे. या बैठकीत आम्ही सर्वजण एकत्र राहून राज्यसभेवरील आमचे उमेदवार निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला गेला.
तसेच विधान परिषदेवर सुद्धा आमचे उमेदवार निश्चित निवडून येतील. विधान परिषद निवडणुकीसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अशी कोणतीही घटना घडणार नाही, असा विश्वास मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला.